आपवर विश्वास दाखवल्याबद्दल आभार : आतिशी
प्रतिनिधी / पणजी
आम आदमी पक्षाने बाणावली आणि वेळळी मतदारसंघात झेंडा रोवत राज्यात पहिला विजय मिळविला आहे. हा विजय म्हणजे गोव्यातील प्रामाणिक राजकारणाची सुरुवात असून आमदार व्हेंझी व्हिएगश आणि प्रुझ सिल्वा हे गोमंतकीयांचा आवाज असतील, असे आश्वासन दिल्लीच्या आमदार तथा गोवा प्रभारी आतिशी दिले आहे.
निकालानंतर पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. त्यावेळी दोन्ही विजयी आमदारांसह ऍड. अमित पालेकर, राहूल म्हांबरे, यांचीही उपस्थिती होती. आजचा दिवस गोव्यासह संपूर्ण भारतासाठी ऐतिहासिक असल्याचे त्या म्हणाल्या. या निकालातून ’आप’ला राष्ट्रीय शक्ती म्हणून मान्यता मिळाली असल्याचे स्पष्ट झाले आहे. पैसा, बळ किंवा जातीय राजकारण न करताही निवडणूक जिंकता येते हे अनेकवेळा ’आप’ने दाखवून दिले आहे. गोव्यात त्याचा पुन्हा प्रत्यय आला आहे, असे त्या म्हणाल्या.
आमदार व्हिएगस यांनी बलाढय़ नेते चर्चिल आलेमाव यांचा पराभव केला आहे. त्यामुळे ते ’जायंट किलर’ ठरले आहेत. तर वेळळी मतदारसंघात पक्षाचे प्रुझ सिल्वा यांनीही माजी मंत्री फिलिप नेरी रॉड्रीग्ज यांचा पराभव केला आहे. असे आतिशी यांनी सांगितले.
आश्चर्यकारक प्रकार म्हणजे दोन्ही आमदार कोणत्याही राजकीय पार्श्वभूमी शिवाय राजकारणात पोहोचले आहेत. त्यांच्याकडे लाखेंचा साठाही नाही. तरीही आज गोमंतकीयांनी सामान्य माणसाला सत्तास्थानी पोहोचविले आहे. असे हे दोन्ही आमदार यापुढे संपूर्ण गोव्याचा आवाज असतील. तसेच जनतेला दिलेली सर्व आश्वासने पूर्ण करण्यासाठी ते कटिबद्ध आहेत आणि त्यांचे मतदारसंघ राज्यातील आदर्श मतदारसंघ बनवण्यासाठी प्रयत्नशील आहेत, असे आतिशी पुढे म्हणाल्या.
त्यानंतर बोलताना दोन्ही आमदारांनी आपल्या या विजयासाठी मतदारांचे तसेच तमाम गोमंतकीयांचे आभार व्यक्त केले. राज्यातील 39 मतदारसंघातून आमचे उमेदवार निवडणूक लढले. प्रत्येक मतदारसंघात लोकांनी आम्हाला भरघोस मतदान केले. आमच्या कोणत्याही उमेदवाराला मतदारांनी नाकारलेले नाही, त्यामुळे गोमंतकीयांचे हे प्रेम आम्ही सदैव स्मरणात ठेऊन गोव्याचा आवाज बनणार आहोत, असे ते म्हणाले.
श्री. म्हांबरे यांनी दोन्ही उमेदवारांचे अभिनंदन केले. श्री. पालेकर यांनी बोलताना, पक्षाची गोव्यातील ही सुरुवात असून भविष्यात दिल्ली आणि पंजाबप्रमाणेच गोव्यातही आम्ही सरकार स्थापन करणार आहोत, असा विश्वास व्यक्त केला.