सांगली जिह्यासह राज्यात सध्या दोन जन्मशताब्दींची चर्चा आहे. एक आहे तराळ अंतराळ या आपल्या आत्मचरित्राद्वारे दलित साहित्यात महत्त्वाची भूमिका पार पाडणारे, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महानिर्वाणपश्चात त्यांच्या प्रबुद्ध भारतची संपादकीय जबाबदारी पार पाडणारे शंकरराव खरात आणि दुसरे आहेत क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिसरकारची धुरा सांभाळत स्वातंत्र्य संग्रामात मोलाची कामगिरी बजावणारे क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी! 11 जुलै रोजी शंकरराव खरात यांच्या जन्मशताब्दीची सांगता सुरू झाली. उद्याही त्यांच्या जन्म गावी आटपाडी येथे गावकऱयांनी एका आगळय़ावेगळय़ा समारंभाचे आयोजन केले आहे. क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी यांचे जन्मशताब्दी वर्ष 15 जुलै रोजी वाळवे गावी सुरू होत आहे. सांगली जिह्याच्या या दोन सुपुत्रांच्या जीवनाचा दीन-दलितांचा उद्धार हा समान धागा होता. अण्णांच्या कार्यावर लवकरच स्वतंत्रपणे लिहिले जाईल. खरात यांच्या कार्याचा मार्ग लेखणीच्याद्वारे जागृती, सत्यशोधन आणि समाज उद्धाराचा होता. तराळ-अंतराळ या आत्मचरित्राच्या सहाय्याने त्यांच्या बालपणीच्या स्थितीचा आणि समाज जीवनाचा आढावा घेता येतो. दलित समाजात जन्माला आलेल्या खरात यांच्या वडिलांना कष्टाची कामे, मृतदेहांच्या विल्हेवाटीप्रमाणेच लोकांच्या घरी बरे, वाईट निरोप पोहोचवण्याची आणि त्यासाठी दूरपर्यंत भटकंती करण्याची जबाबदारी होती. त्या कष्टानंतरही मिळायची ती अवहेलनाच. बहिणीच्या मृत्यूचे आलेले पत्र वाचायला न आल्याने गावातील सुशिक्षिताच्या घरी ते चार ओळीचे पत्र वाचण्यासाठी त्यांना दिवसभर लाकूड फोड करून द्यावी लागली. नंतर त्यांना बहिणीच्या मृत्यूची वार्ता वाचून दाखवण्यात आली. खरात यांच्या बालपणी त्यांचे वडील परगावी गेले असताना गावात आत्महत्या केलेल्या व्यक्तीचा झाडावरून खाली उतरवण्याची जबाबदारी बाल्यावस्थेतील शंकररावांना नाईलाजाने पार पाडावी लागली. एखाद्या घरात मृत्यू झाला तर मृतदेहाच्या अंगावरील पांढरे कापड आपल्याला कपडे शिवण्यासाठी मिळणार याचा आनंद त्यांना व्हायचा. या अशा जगण्यातून बाहेर पडण्यासाठी त्यांनी शिक्षणाचा मार्ग स्वीकारला. पुढच्या शिक्षणासाठी आटपाडीहून औंधला चालत जाताना रस्ता माहित नसल्याने संस्थानी उंटाच्या मागे त्यांना चालावे लागले. पण स्वाराने खालच्या जातीतील असल्याने त्या चिमुरडय़ा पोराला उंटावर बसवून घेतले नाही. असे आयुष्यातील अनेक प्रसंग पार पाडत शंकरराव शिकले. पंढरपुरातील वाळवंटात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने प्रभावित झाले. वकील बनले आणि सर्वसामान्य, दलितांच्या केसेस चालवू लागले. त्यांना न्याय मिळवून देऊ लागले. बाबासाहेबांच्या धर्म परिवर्तनावेळीही ते उपस्थित होते आणि त्यांच्या मृत्यूपश्चात त्यांचे वृत्तपत्रही त्यांनी चालवले. आपल्या लेखणीतून भारतीय समाज जीवनावर भाष्य करताना त्यांनी नेहमीच दलित समाजाच्या स्थित्यंतराचा वेध घेतला. क्रांती अपूर्ण राहिली आणि ती पूर्ण व्हायची असेल तर जातीव्यवस्थेपासून समाज व्यवस्थेपर्यंत लोकशाहीचे चक्र असासह फिरले पाहिजे असा विचार त्यांनी मांडला. दगड आणि प्राण्यातसुद्धा देव पाहणाऱया भारतीय समाजाने माणसात देव पहावा. उच्च-नीच, शूद्र असे न मानता समाजाने आपली दृष्टी बदलली पाहिजे आणि त्याचवेळी दलित आणि शोषितांनी स्वतःच्या उद्धारासाठी स्वतःच झटले पाहिजे. तरच या विषमतेतून मार्ग निघेल, असे ते आयुष्यभर सांगत राहिले. त्या काळात दलित व्यक्तींवर चालवल्या जाणाऱया चॅप्टर केसेस त्यांनी निशुल्क किंवा कमी खर्चात लढवल्या. शेडय़ुल्ड कास्ट फेडरेशन, भटक्मया विमुक्तांच्या संघटनांच्या, कामगार संघटनांच्या सोबतीने उपेक्षितांचे प्रश्न सोडवून प्रत्यक्ष समाजकार्यात सक्रिय झाले. 1942 च्या स्वातंत्र्य लढय़ाने त्यांना खुणावले नसते तरच नवल. भारत छोडो आंदोलनातील भूमिगत कार्यकर्त्यांना सायकलोस्टाईल केलेली पत्रे पोहोचवण्याचे काम त्यांनी केले. दलित जीवनावर आधारित कथा, कादंबऱयांमधून मांडले जाणारे दलितांचे जीवन कृत्रिम असल्याचे दाखवून त्यांचे जीवन काय आहे आणि प्रश्न काय आहेत हे आपल्या लिखाणातून उतरवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. 1956-57 च्या नवयुग दिवाळी अंकातील त्यांची ‘सत्तूची पडीक जमीन’ ही पहिली कथा, त्यानंतरच्या वषी महार, बलुतेदारांवर लिहिलेली ‘माणुसकीची हाक’ ही कादंबरी, त्यानंतर राजकारणाला मागे टाकून त्यांनी साहित्य साधना सुरू केली. आज इथं तर उद्या तिथं, आडगावचे पाणी, गावचा टीनपोल गुरुजी, गाव-शिव, झोपडपट्टी, टिटवीचा फेरा, तडीपार, दवंडी, फुटपाथ नंबर 1, बारा बलुतेदार, मसालेदार गेस्ट हाऊस, माझं नाव, सांगावा, सुटका, हातभट्टी इत्यादी पुस्तके लिहिली. याद्वारे दलित वेदनेला त्यांनी फुंकर घातली. पुढे त्यातून नव्या दलित चळवळीची जडणघडणही झाली. तराळकीचे कार्य करणाऱयाचा मुलगा शिक्षणाच्या पाठबळाने अंतराळापर्यंत पोहोचला हा विचार आजच्या आरक्षणकांक्षी सर्वच समाजापर्यंत अधिक व्यापकपर्यंत पोहोचवण्याची आवश्यकता आहे. तो विचार योग्य मार्गाने संपूर्ण समाजापर्यंत पोहोचवण्यात मराठी साहित्य, मराठी शिक्षण क्षेत्र आणि मराठी राज्यकर्ते कमी पडले आहेत. त्यामुळेच महाराष्ट्रात महामानवांना आपापल्या जातीत बंदिस्त करण्याचे कार्य जो तो करू लागला आहे. त्यांच्या कार्य आणि विचारांपेक्षा भलत्याच गोष्टींवर चर्चा घडवून आणणाऱयांना समाजाचे हित साधायचे नाही. अशा संधीसाधूंना ओळखण्यासाठी समाजाचे डोळे उघडण्याची गरज आहे. त्यासाठी समाजाचे नेतृत्व करणाऱयांची मने सांधण्याचीही गरज आहे. फक्त जय जयकाराला नव्हे तर वास्तवाला भिडणारे आणि ते मान्य करुन स्वतःत बदल करणारे जाणते हवे आहेत. अशा जाणत्यांमुळे नव्या सहस्त्रकात दलितांच्या, वंचितांच्या सुधारणेला पंख फुटेल अशी आशा व्यक्त करत शंकरराव खरात यांनी या जगाचा बावीस वर्षांपूर्वी निरोप घेतला. मात्र त्यांचा निरोप खऱया अर्थाने समाजापर्यंत पोहोचवण्याचे कार्य आजही करण्याची आवश्यकता आहे.
Previous Article‘अग्निपथ’वर संरक्षण सल्लागार समितीची बैठक
Next Article पलानिसामी हेच अण्णाद्रमुकचे सर्वोच्च नेते
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.