प्रतिनिधी/ संकेश्वर
पाच शतकांहून अधिक कालावधीचा साक्षीदार ठरलेला करवीर-संकेश्वर पीठाचा रथोत्सव मंगळवारी मोठय़ा उत्साहपूर्ण वातावरणात होणार आहे. यात्रेचा मुख्य दिवस असल्याने कर्नाटकसह महाराष्ट्रातील हजारो भाविकांची उपस्थिती या रथोत्सवावेळी असणार आहे. यात्रोत्सव शांततेत होण्यासाठी भाविकांनी सहकार्य द्यावे, असे आवाहन पीठाधिश जगद्गुरु सच्चिदानंद विद्या नरसिंह भारती स्वामीजींनी केले आहे.
रथससप्तमीपासून रथोत्सवाच्या सोहळय़ाला सुरुवात झाली आहे. रविवारी रथ बनशंकरी मंदिराकडे आला असून मंगळवारी दुपारी 2 वाजता ढोलताशा, झांजपथक, बँड, गोंधळीवाद्यासह सनई चौघडाच्या संगीत साथीने पुन्हा शंकराचार्य मठाकडे आणला जाणार आहे. हा रथोत्सव सोहळा पाहण्यासाठी व दक्षिणकाशी अशी ख्याती असणाऱया शंकरलिंगाचे दर्शन घेण्यासाठी भाविक व पाहुणे मंडळी सोमवारपासूनच शहरात दाखल होत आहेत.
रथाखालीच श्रीफळ वाढवा
मंगळवारी रथोत्सवादिवशी भाविक श्रद्धेने रथावर खारीक-खोबऱयाचे तुकडे उधळतात. तसेच अखंड श्रीफळही रथाला वेगाने मारुन फोडला जातो. ही प्रथा जरी प्राचीन काळापासून असली तरी सध्या भाविकांची वाढती गर्दी व चुकलेल्या नेमामुळे भाविकांना श्रीफळाचा मार बसून ऐन सोहळय़ात कोणाला इजा होणे योग्य नाही. त्यामुळे भाविकांनी रथाच्या खालीच श्रीफळ वाढवावा, असे आवाहन जगद्गुरू सच्चिदानंद अभिनव विद्या नरसिंह भारती स्वामीजी यांनी केले आहे.