‘हर हर महादेव’च्या जयघोष – भाविकांची मोठी उपस्थिती – कडेकोट पोलीस बंदोबस्त
प्रतिनिधी/ संकेश्वर
जगद्गुरु शंकराचार्य संस्थान पीठाच्या रथोत्सवास शनिवारी असंख्य भाविकांच्या उपस्थित प्रारंभ झाला. संस्थानचे पीठाधीश जगद्गुरु शंकराचार्य सच्चिदानंद विद्या अभिनव भारती स्वामीजींनी रथाची विधीपूर्वक पूजा केली. त्यानंतर सजविण्यात आलेल्या रथात दुपारी 3 वाजता स्वामीजी विराजमान झाले. यानंतर उपस्थित भाविकांनी दोरखंडाने शंकराचार्य मठापासून नारायण मंदिरापर्यंत रथ ओढत आणला. यावेळी भाविकांकडून ‘हर हर महादेव’चा जयघोष करण्यात आला.
अष्टकोनी रचना असलेला हा सागवाणी रथ 14 फूट उंच असून त्याला 6 चाके आहेत. उत्सवकाळात रथावर 5 मजली लाकडी मंडप उभारल्याने हा रथ एकूण 54 फूट उंचीचा बनतो. तर माघमास पुण्यतिथीनिमित्त रथ कापडी पताका, भगव्या झेंडय़ांनी सजविला जातो. त्यावर कळस ठेऊन रथात शंकर-पार्वतीची उत्सवमूर्ती ठेवली जाते. तर याचे पौरोहित्य श्रीपाद उपाध्ये करतात.
समारंभात नगराध्यक्षा सीमा हतनुरे, नगरसेविका विद्या बांबरे, आप्पासाहेब शिरकोळी, माजी नगराध्यक्ष गजानन क्वळ्ळी, श्रीकांत हतनुरे, उपनगराध्यक्ष अजित करजगी, नगरसेवक सचिन भोपळे, गंगाराम भुसगोळ, बसनगौडा पाटील, अशोक पाटील, बाळासाहेब वैरागी, दीपक भिसे, दिनेश कोळेकर, शंकर हेगडे, प्रकाश नेसरी, गिरीश कुलकर्णी, महादेव डावरे, शंकर क्वळ्ळी, पुष्पराज माने, राजू बांबरे, किरण नेसरी, किर्तीकुमार संघवी, राजेंद्र बोरगावी, सुहास कुलकर्णी, आप्पा पाटील, प्रसाद बेवीनकट्टी, पालिका मुख्याधिकारी जगदीश ईटी, अभियंता आर. बी. गडाद, संस्थान मठाचे व्यवस्थापक अर्जुन कानवडे आदींसह मठाचे मानकरी, भाविक सहभागी झाले होते.