चाकरमान्यांची गावी येण्यास असमर्थता : तयार मूर्तींचे करायचे काय? मूर्तिकारांसमोर मोठा प्रश्न
प्रतिनिधी / मालवण:
मालवण शहर आणि लगतच्या काही गावांतील सुमारे शंभर पेक्षा जास्त मुंबईकर चाकरमान्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर क्वारंटाईन कालावधी आदी अडचणींमुळे गणेशोत्सवासाठी गावी न येण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे याचा मोठा फटका गणेश मूर्ती शाळांना बसला आहे. शासनाकडून चाकरमान्यांना गावी आणण्यासाठी एसटी अगर ट्रेनची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. त्यामुळे खासगी गाडय़ा अगर वाहन घेऊन येण्यास चाकरमानी अनुत्सुक असल्याचे दिसत आहे. शहर, ग्रामीण भागात अशा परिस्थितीमुळे गणेश मूर्ती शाळा चालक विवंचनेत आहेत.
मालवण शहरासह तालुक्यात अनेक घरांमध्ये गणपती उत्सव चाकरमानी आल्यानंतरच साजरा केला जातो. यावेळी ट्रेन आणि एसटी गाडय़ा सोडण्याबाबत शासन निर्णय झालेला नाही. चाकरमान्यांकडे सर्वांकडेच स्वत:चे वाहन आहे, असे नाही. आराम बसमध्येही प्रवाशांची मर्यादित संख्या असल्याने त्यांनीही सर्वसामान्यांना परवडणार नाहीत, असेच भाडे निश्चित केले आहेत. यात काही ठिकाणी 2500, काही ठिकाणी 3000 असा तिकीट दर गणपती कालावधीसाठी ठेवण्यात आला आहे. त्यामुळे एका घरातील पाच ते सहा मंडळी गावी यायची झाल्यास तीस ते चाळीस हजार रुपये खर्च येण्याची शक्यता आहे. त्यामुळे चाकरमानी मुंबईतच राहून ‘गणपती बाप्पा मोरया’ म्हणण्याच्या स्थितीत आहेत.
ताळमेळ घालायचा कसा? – सुनील वायंगणकर
शहरातील दिलीप व सुनील वायंगणकर यांच्याशी याबाबत चर्चा केली असता, त्यांनी चाकरमान्यांच्याच जीवावर आतापर्यंत गावातील गणपती उत्सव साजरा होत असतो. मात्र, आज अनेक घरे बंद आहेत. चाकरमानी गणपतीच्या अगोदर दोन दिवस येऊन घरांची साफसफाई करून गणपती बाप्पांच्या आगमनासाठी आतुरलेला असतो हा आतापर्यंतचा इतिहास आहे मात्र आता चाकरमान्याला चौदा दिवस अगोदर येऊन घरात क्वारंटाईन राहवे लागणार आहे. जेवणाची व्यवस्था त्याची त्यालाच करावी लागणार आहे. लहान मुले, घरातील ज्येष्ठ मंडळींना घेऊन खासगी गाडीने किंवा आराम बसने येण्यासाठी आता चाकरमानी इच्छुक नसल्याचे दिसत आहे. आमच्याकडे काहींनी मोबाईलवर फोन करून आपल्या अडचणी बोलून दाखवित यावर्षी मुंबईतच घरात गणपती बाप्पांचे पूजन करणार असल्याचे सांगितले. नेहमी येणारा चाकरमानी यावर्षी येणार नसल्याने आम्हीही त्याच्यावर जबरदस्ती करू शकत नाही. मात्र, अशाप्रकारे अनेक शाळांतील गणपती तयार होऊनही आता ते शाळेतच राहणार आहेत. त्यामुळे केलेली मेहनत आणि आलेला खर्च याचा ताळमेळ घालणे कठीण होणार असल्याचे बोलून दाखविले.
इच्छा असूनही व्यवस्था निर्माण होणार कशी?
आम्ही गणपती उत्सवासाठी दोन दिवस अगोदर घरी येऊन साफसफाई करून गणपतीची आरास करतो. मात्र, सध्या कोरोना संकटात आपण नोकरी सांभाळून गावी येणे शक्य होणार नाही. घरातील सर्व मंडळींना घेऊन आल्यानंतर गावी 14 दिवस आणि पुन्हा गावातून मुंबईत आल्यावर 14 दिवस क्वारंटाईन राहणे म्हणजे त्रासदायक ठरणार आहे. मी माझ्या कुटुंबात एकटाच कमवता असल्याने मलाच नोकरीवर जाणे आवश्यक आहे. तीन महिने मी घरात थांबून होतो. त्यामुळे यावेळी नागपंचमी मुंबईत केली. आता गणपती बाप्पांचीही सेवा मुंबईतच करणार आहे. आपली इच्छा गावी येण्याची आजही आहे मात्र क्वारंटाईन कालावधी आणि परिसरातील नागरिकांच्या मनात चाकरमान्यांबद्दल निर्माण झालेली भीती यावर विचारमंथन होणे गरजेचे आहे. गावी आल्यानंतर संपूर्ण कुटुंबाची जेवणाची व्यवस्था आणि इतर सुविधा निर्माण होण्यास अडचणीचे ठरणार आहे. यामुळे यावर्षी नाही, तर पुढील वर्षी येऊ असे म्हणून मुंबईतच थांबण्याचा निर्णय घेतला आहे. सध्याच्या वातावरणात मुंबईकर चाकरमानी गावच्या ओढीपासून दुरावण्याची भीती आहे, असेही हिरवे म्हणाले. महेश हिरवे हे मुंबई येथील मुलुंड परिसरात राहत असून एअर इंडिया या विमानसेवेत कार्यरत आहेत.
‘तयार गणेश मूर्ती मिळतील!’
मालवणात अनेक मूर्तिकारांनी गणेश मूर्ती बनविलेल्या आहेत. यातील शंभरहून अधिक मूर्ती आता रद्द करण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. अशावेळी रंगकाम करण्यात आलेल्या मूर्ती नेणार कोण? असा मोठा प्रश्न गणेश मूर्तिंकारांना पडला आहे. त्यामुळे काहींनी सोशल मीडियाचा आधार घेत, तयार गणेश मूर्ती मिळतील. अशा पद्धतीने गणेश मूर्तींचे फोटो आणि मेसेज शेअर करण्यास सुरुवात केली आहे. चाकरमानी न येण्याने गणेश मूर्तिंकारांबरोबर त्यांच्यावर अवलंबून असणारे इतर कारागिर, कामगारांच्याही अडचणी वाढणार आहेत.