प्रतिनिधी / कोल्हापूर
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजपचे प्रवक्ते किरीट सोमया आणि आपल्या विरुध्द केलेला शंभर कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा रद्द करण्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. पण न्यायालयाने हा दावा चालण्यास पात्र असल्याचे स्पष्ट करत पाटील यांचा अर्ज नामंजूर केला अशी माहिती मुश्रीफ यांचे वकील ऍड प्रशांत चिटणीस यांनी दिली.
भाजपचे प्रवक्ते किरीट सोमया यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबाबत विधाने केली होती. तसेच प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही विधाने केली होती. ही विधाने आपली व कुटुंबाची बदनामी करणारी असे सांगत मंत्री मुश्रीफ यांनी या दोघांविरुध्द न्यायालयात शंभर कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. तर चंद्रकांत पाटील यांनी हा दावा दाखल करण्यासाठी कोणतेही कारण घडले नाही. यामुळे दावा रद्द करावा असा अर्ज न्यायालयात दाखल केला आहे. बुधवारी सहावे सह दिवाणी न्यायाधीश पी.व्ही. राणे यांच्यासमोर या अर्जावर सुनावणी झाली.
चंद्रकांत पाटील यांच्या वतीने मुंबई येथील वकील ऍड प्रल्हाद परांजपे यांनी युक्तिवाद केला. तर मुश्रीफ यांच्या वतीने ऍड प्रशांत चिटणीस व सतीश कुणकेकर यांनी युक्तिवाद केला. दोन्ही बाजूचे म्हणणे विचारात घेऊन न्यायाधीश राणे यांनी मुश्रीफ यांनी दाखल केलेल्या दाव्यात कारण आहे. यामुळे दावा चालण्यास पात्र आहे असे स्पष्ट करुन पाटील यांचा अर्ज नामंजूर केल्याचे ऍड चिटणीस यांनी सांगितले.