निव्वळ संशयाच्या आधारे अटक : नियम पायदळी तुडवत पोलिसांकडून कार्यवाही, सीआयडीने पोलीस स्थानकातील हार्डडिस्क तपासण्याची गरज
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात झालेल्या लॉकअप डेथ प्रकरणाला दहा दिवस उलटले आहेत. आठ दिवसांपूर्वीच या प्रकरणाच्या तपासासाठी बेंगळूर येथील सीआयडीचे अधिकारी बेळगावात दाखल झाले आहेत. या आठ ते दहा दिवसांत अनेक घडामोडी घडल्या आहेत. पोलिसांच्या ताब्यात असताना संशयास्पदरित्या मृत्यू झालेल्या संशयिताला न्याय देण्यासाठी कोणीच पुढे येताना दिसत नाही. उलट या प्रकरणातून स्वतःची सुटका कशी होईल? याचाच विचार पोलीस अधिकारी करीत आहेत.
बसनगौडा पाटील (वय 45) रा. बेल्लद बागेवाडी, ता. हुक्केरी याला शुक्रवार दि. 11 नोव्हेंबर रोजी दुपारी बेळगाव ग्रामीण पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. पोलीस स्थानकात चौकशी करताना प्रकृती खालावल्याने त्याला सिव्हिल हॉस्पिटलला हलविण्यात आले. उपचाराचा उपयोग न होता त्याचा मृत्यू झाला. बसनगौडाच्या कुटुंबीयांनी पोलिसांच्या जाचामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप केला आहे.
त्याला गांजा प्रकरणात चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते. इतकीच पुसटशी माहिती पोलीस अधिकाऱयांनी या घटनेनंतर दिली होती. प्रत्यक्षात एकाचा बळी घेणारे हे प्रकरण तरी काय आहे? याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला असता या प्रकरणाची सुरुवात तीन महिन्यांपूर्वी झाली. योगायोग म्हणजे 11 ऑगस्ट रोजी बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात अमलीपदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत एफआयआर दाखल होतो. या प्रकरणाच्या चौकशीसाठी 11 नोव्हेंबर रोजी बसनगौडाला ताब्यात घेतले जाते. त्याच दिवशी पोलीस कोठडीत त्याचा मृत्यू होतो.
11 ऑगस्ट रोजी हिंडलगा मध्यवर्ती कारागृहाचे साहाय्यक अधीक्षक शहाबुद्दिन कालेखान यांनी बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात एक फिर्याद दिली आहे. जयंतीनगर, कणगला, ता. हुक्केरी येथील ताजिरु गुडूसाब बस्तवाड (वय 28) या कच्च्या कैद्याला अमलीपदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत दाखल झालेल्या खटल्याच्या सुनावणीसाठी बेळगाव येथील न्यायालयात हजर केलेले असते. न्यायालयीन कामकाज आटोपून कारागृहात येताना प्रवेशद्वारावरच त्याची तपासणी होते.
ताजिरुला न्यायालयात नेत असताना त्याच्या चपला वेगळय़ा होत्या. सुनावणीनंतर त्याला परत कारागृहात आणल्यानंतर त्याच्या चपला बदललेल्या दिसल्या. याचा अधिकाऱयांना संशय येतो. त्याची तपासणी केली जाते. त्यावेळी चपलांच्या टाचेमध्ये शंभर ग्रॅम गांजा आढळतो. त्याच दिवशी त्याच्यावर एफआयआर दाखल केला जातो. (गुन्हा क्र. 160/2022). 30 ऑगस्ट रोजी बेळगाव ग्रामीण पोलीस त्याला ताब्यात घेऊन अटकेची प्रक्रियाही पूर्ण करतात.
येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी द्वितीय न्यायालयात त्याला हजर केले जाते. 5 सप्टेंबर 2022 रोजी ताजिरुला जामीनही मिळतो. पोलिसांना दिलेल्या जबानीत ताजिरु बसनगौडाच्या नावाचा उल्लेख करतो. याच प्रकरणाच्या चौकशीसाठी बेळगाव ग्रामीण पोलिसांनी बेल्लद बागेवाडीला जाऊन बसनगौडाला ताब्यात घेतले होते. त्याच्या कुटुंबीयांच्या मते बसनगौडावर अमलीपदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हे दाखल झाले आहेत, हेच आपल्याला माहीत नाही.
नियम धाब्यावर बसविल्याचे निदर्शनास
100 ग्रॅम गांजाच्या प्रकरणात हाती घेतलेली चौकशी बेळगाव ग्रामीण पोलिसांना चांगलीच महागात पडली आहे. पोलिसांनी बसनगौडाला अटक करताना त्याच्या कुटुंबीयांना माहिती दिली नाही. काकतीजवळ आल्यानंतर त्याला घाम सुटला. त्याची प्रकृती खालावली. त्याच्यावर खासगी दवाखान्यात उपचार करण्यात आले. उपचारांती बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात नेण्यात आले. तेथे गेल्यानंतरही तो अस्वस्थच होता. खरेतर त्याला जवळच्या इस्पितळात वेळेत दाखल केले असते तर कदाचित त्याचा जीव वाचला असता. सर्व नियम धाब्यावर बसवून पोलिसांनी हे प्रकरण हाताळल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. लॉकअप डेथ प्रकरणात शवचिकित्सा करताना डॉक्टरांचे एक पॅनल तयार केले जाते. हे नियमही या प्रकरणात पाळले नसल्याचे दिसून येते. या प्रकरणाच्या तपासासाठी गेले आठ दिवस सीआयडीचे अधिकारी बेळगावात आहेत. सीआयडी तपासात बसनगौडाला न्याय मिळणार की या प्रकरणात गुंतलेल्या पोलीस अधिकाऱयांना क्लिन चीट मिळणार हे लवकरच स्पष्ट होणार आहे.
अहो, आश्चर्यम! स्थानकातील सर्वच कॅमेरे बंद!
पहिल्या दिवसापासूनच या प्रकरणात पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे. हृदयाघाताने बसनगौडाचा मृत्यू झाल्याचे अधिकारी सांगत आहेत. डॉक्टरांचेही म्हणणे असेच आहे. मात्र, बसनगौडाची मुलगी रोहिणी पाटील हिने पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. आपल्या वडिलांचे हात बांधलेले होते. त्याचे व्रण हातावर स्पष्टपणे दिसत होते, हे आपण पाहिले आहे. त्यामुळे पोलिसांच्या जाचामुळेच आपले वडील दगावले आहेत, असा आरोप तिने केला आहे. या प्रकरणातून सुखरुप बाहेर पडण्यासाठी पोलीस स्थानकातील सर्व सीसीटीव्ही बंद आहेत, असे सांगून फुटेज देण्यास अधिकाऱयांनी टाळाटाळ केली आहे. खरेतर सीआयडीच्या अधिकाऱयांनी हार्डडिस्क ताब्यात घेतली तर ग्रामीण पोलिसांचे बिंग फुटणार आहे. म्हणूनच की काय तपास अधिकाऱयांची चांगलीच बडदास्त ठेवली जात आहे. तसेच जागृत देवीला साकडे घालून आपल्याला वाचविण्याची प्रार्थनाही केली आहे. एरवी एखाद्या घरात किंवा आस्थापनात चोरीची घटना घडली की सीसीटीव्ही का बसविले नाहीत? अशी विचारणा पोलीस अधिकारी करतात. बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात कॅमेरे आहेत, सर्व कॅमेरे एकदाच कसे बंद पडतात? याचा तपास वरि÷ अधिकाऱयांना करावा लागणार आहे. नहून सर्वसामान्यांचा पोलीस दलावरील विश्वास उठणार आहे.