नवारस्ता/प्रतिनिधी
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी कोरोना संसर्गापासून बचाव करण्यासाठी “माझे कुटूंब माझी जबाबदारी” ही संकल्पना राज्यातील जनतेच्या समोर ठेवली आहे. मुख्यमंत्री यांच्या या संकल्पनेची जनजागृती गृहराज्यमंत्री शंभूराज देसाईंनी त्यांच्या मतदारसंघातील सर्व शासकीय अधिकाऱ्यांना बरोबर घेत प्रत्यक्षात ध्वनिक्षेपक वरून मतदारसंघातील ग्रामीण भागातील अनेक गावात जाऊन जनजागृती केली.
सामाजीक अंतर पाळत स्पिकरवरून त्यांनी ग्रामीण भागातील नागरिक, महिला व युवक-युवतींना या अभियानाचे महत्व पटवून दिले.कोरोना संसर्गापासून आपणच आपला बचाव केला पाहिजे याकरीता हे अभियान खुप महत्वपुर्ण आहे.त्यामुळे ग्रामीण भागातील कुटुंबांतील प्रत्येकाने सतत मास्क वापरा, बाहेरुन घरात आल्यानंतर हातपाय स्वच्छ धुवा, घरातून बाहेर गेल्यानंतर सामाजिक अंतर पाळा या महत्वाच्या बाबींचे आवाहन शंभूराज देसाईंनी गावागांवात जावून केले असून कोरोनाच्या महामारीत राज्याचे मुख्यमंत्री महोदय व त्यांच्या मार्गदर्शनाखालील संपुर्ण राज्य शासन राज्यातील जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचेही शंभूराज देसाईंनी सांगितले.