जी-20 परिषदेत महत्वपूर्ण निर्णय, कोळशासाठी अर्थसाहाय्यही थांबविणार
रोम / वृत्तसंस्था
या शतकाच्या मध्यापर्यंत वातावरणात होणारे कार्बनचे उत्सर्जन पूर्णपणे थांबविण्याचा महत्वपूर्ण निर्णय जी-20 परिषदेत घेण्यात आला आहे. दोन दिवस चाललेल्या या परिषदेत अखेरच्या दिवशी हा प्रस्ताव संमत करण्यात आला. हा तडजोडीचा प्रस्ताव असून कोळशावर वीज निर्माण करणाऱया देशांच्या भूमिकेचाही त्यात विचार करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रस्तावामुळे स्कॉटलंड येथील ग्लासगो येथे होणाऱया पर्यावरण परिषदेचा पाया घातला गेला आहे.
कोळशावर वीज निर्माण करणाऱया देशांसाठी या प्रस्तावात काही सवलती देण्यात आल्या आहेत. कोळसा विकत घेण्यासाठी आतापर्यंत देण्यात येत असलेले अर्थसाहाय्य थांबविण्यात येणार आहे. तथापि, जे देश देशांतर्गत कोळसा उत्पादन करुन वीज निर्मिती करतात त्यांना तसे करण्यास सूट देण्यात आली आहे. यामुळे भारत आणि चीन आदी देशांना दिलासा मिळाला आहे. तथापि, हा ब्रिटनला धक्का मानण्यात येत आहे. कोळशाच्या उपयोगासंबंधी कठोर प्रस्ताव संमत करण्यात येईल, अशी अपेक्षा ब्रिटनने आधी व्यक्त केली होती.
जी-20 देश परिषदेतील सदस्य देश जगातील सर्वात सुसंपन्न देश आहेत. जगाच्या कार्बन उत्सर्जनातही त्यांचा वाटा 75 टक्क्यांहून अधिक आहे. या देशांनी हे उत्सर्जन कमी करण्याची आणि आर्थिकदृष्टय़ा कमकुवत देशांना वाढत्या तापमानाच्या दुष्परिणामांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी सहाय्य करण्याची योजना आखली आहे. जगाचे तापमान येत्या तीन दशकांमध्ये दीड डिग्री सेंटिग्रेडने कमी करण्याचे ध्येय ठेवण्यात आले आहे. ग्लासगो येथे रविवारी पर्यावरण संरक्षणासंबंधीची परिषद सुरु झाली असून या परिषदेत अधिक चर्चा होणार आहे.
कोळशाचा उपयोग कमी करणार
ऊर्जानिर्मितीसाठी कोळशाचा उपयोग टप्प्याटप्प्याने कमी केला जाणार असून येती 40 वर्षे किंवा तत्सम कालावधीमध्ये तो पूर्णपणे थांबविला जाणार आहे. यासाठी सर्व देशांचे सहकार्य आवश्यक आहे. जागतिक वित्तसंस्थांकडून विकसनशील देशांना कोळशासाठी दिले जाणारे अर्थसाहाय्यही टप्प्याटप्प्याने थांबविले जाणार आहे. कोळशातील गुंतवणूक कमी करुन पुनउ&पयोगी ऊर्जेचे उत्पादन वाढविण्यासाठी विकसनशील देशांना प्रोत्साहित करण्यात येणार आहे.
ग्लासगो परिषदेस प्रारंभ
जगाला तापमानवाढीच्या संकटातून मुक्त करण्यासाठी ‘शेवटचा आशेचा किरण’ म्हणून ओळखल्या जाणाऱया ग्लासगो पर्यावरण परिषदेचा प्रारंभ रविवारी झाला आहे. या परिषदेपूर्वी दोन आठवडे 200 देशांमध्ये प्रदीर्घ आणि सखोल चर्चा झाली होती. या चर्चेचे फलित काय हे या परिषदेत स्पष्ट होणार आहे. स्कॉटलंडच्या ग्लासगो या सर्वात मोठय़ा शहरात ही परिषद होत आहे. बहुतेक सर्व देशांचे प्रतिनिधी परिषदेला उपस्थित राहणार असून ते सोमवारपर्यंत येथे येत आहेत. सोमवारी मुख्य चर्चा असून महत्वपूर्ण प्रस्ताव संमत होण्याची शक्यता आहे.
शास्त्रज्ञांना शंका
जगाचे तापमान 1.5 डिग्रीने कमी करण्याचे ध्येय ठेवण्यात आले असले तरी ते साध्य करणे दुरापास्त असल्याचे अनेक तज्ञांनी स्पष्ट केले आहे. 2015 च्या पॅरीस हवामान परिषदेत हे ध्येय ठेवण्यात आले होते. तथापि, त्यानंतर तापमान कमी होण्याऐवजी ते 1 डिग्रीने वाढले आहे. या शतकाच्या अखेरीपर्यंत तापमानात 2.7 टक्क्यांची भरच पडेल अशी शक्यता अनेक संशोधकांनी व्यक्त केली आहे.