इस्रोकडून महत्त्वपूर्ण उपग्रहाचे गुरुवारी प्रक्षेपण- सैन्यदलाला मिळणार मोठी मदत
वृत्तसंस्था / बेंगळूर
स्वातंत्र्यदिनापूर्वी म्हणजेच 12 ऑगस्ट रोजी भारत स्वतःचा सर्वात आधुनिक उपग्रह ‘जीसॅट-1’चे प्रक्षेपण करणार आहे. हा उपग्रह देशाची सुरक्षा आणि हवामानाच्या माहितीच्या दृष्टीकोनातून अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. या उपग्रहाच्या मदतीने भारताला सीमांची वास्तविक छायाचित्रे सहजपणे टिपता येणार आहेत. पाकिस्तान आणि चीनसोबतच्या सीमेवर भारत पूर्वीपेक्षा अधिक चांगल्याप्रकारे देखरेख ठेवू शकणार आहे. देशाचा हा महत्त्वपूर्ण उपग्रह 12 ऑगस्ट रोजी पहाटे 5.43 वाजता श्रीहरिकोटा येथून झेपावणार आहे.
पृथ्वीपासून 36 हजार किलोमीटरवरील कक्षेत स्थिरावल्यावर इस्रोचा हा उपग्रह आकाशात देशाचे नेत्र ठरून सीमावर्ती भागांवर नजर ठेवणार आहे. या उपग्रहाच्या नजरेतून देशाचे शत्रू देखील वाचू शकणार नाहीत. भू-अवलोकन उपग्रहाचे हे प्रक्षेपण भारतासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. अत्याधिक क्षमतेचे कॅमेरे बसविण्यात आल्याने उपग्रह भारतीय भूमी आणि सागरी क्षेत्रावर नजर ठेवू शकेल अशी माहिती अंतराळ विभागाच्या एका अधिकाऱयाने दिली आहे.
कोरोना महामारीमुळे या उपग्रहाचे प्रक्षेपण यापूर्वी लांबणीवर पडले होते. यापूर्वी 28 फेब्रुवारी रोजी इस्रोने ब्राझीलच्या अमेझोनिया-1 या उपग्रहासह 18 छोटय़ा उपग्रहांना प्रक्षेपित केले होते. इस्रोचा जीएसएलव्ही-एफ10 रॉकेट अखेरीस 2,268 किलोग्रॅम वजनाच्या जीसॅट-1 उपग्रहाला (कोडनेम ईओएस-03) जियो-ऑर्बिटमध्ये पोहोचविण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे. या उपग्रहाच्या प्रक्षेपणासह देशाच्या सीमा सुरक्षेसह नैसर्गिक आपत्तींसमवेत हवामानाची प्रत्यक्षवेळेतील माहिती मिळत राहणार आहे.