प्रतिनिधी/ बेळगाव
26 जानेवारी प्रजासत्ताकदिनी रायचूर येथील जिल्हा न्यायाधीशांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केला म्हणून विविध दलित संघटना आंदोलन करत आहेत. त्या न्यायाधीशांवर कठोरात कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी मोर्चे काढण्यास सुरुवात करण्यात आली आहे. शनिवारी चार दलित संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन दिले.
रायचूर येथील जिल्हान्यायाधीश मल्लिकार्जुन गौडा हे ध्वजारोहण करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा हटवावी, अशी सूचना केली. ती प्रतिमा हटविल्यानंतरच ध्वजारोहण करू, असे सांगितले. यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केला आहे. तेक्हा त्यांच्या विरोधात कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. दलित संघटनांमुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसर गजबजला होता.
शनिवारी सफाई कर्मचारी समिती, संविधान शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर सेवा संघ, बुद्धिस्ट सोसायटी संघ, डॉ. बी. आर. आंबेडकर शक्ती संघ या संघटनांनी जिल्हाधिकाऱयांना निवेदन दिले. जबाबदार व्यक्ती म्हणून ओळखल्या जाणाऱया न्यायाधीशांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केला आहे. ही बाब अत्यंत गंभीर आहे. तेव्हा संबंधित न्यायाधीशांवर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली.
ज्यांनी देशाची घटना लिहिली त्यांचाच अशाप्रकारे देशामध्ये अवमान होत आहे. ही बाब अत्यंत गंभीर आहे. सध्या जी घटना घडली आहे ती एका न्यायाधीशांकडून घडली आहे. त्यामुळे हा मोठा अवमान आहे. न्यायाधीश मल्लिकार्जुन गौडा यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
यावेळी के. डी. मंत्रेशी, विजय कोल्हापुरे, मुनीस्वामी भंडारी, विजय नेरगट्टी, यल्लाप्पा कांबळे, सुनील बनसी, शेखर शिंगे, यमनाप्पा गडनाईक, राजू गणाचारी, पंडित शमरंत, देवराज वड्डर, चंद्रकांत कोलकार, रमेश कांबळे, लक्ष्मण कोलकार, सागर कोलकार, शंकर कोलकार, कस्तुरी निंगण्णावर, यल्लाप्पा गडदेवर, लक्ष्मण मेत्री, गोविंद मेत्री, विशाल कोलकार, परशुराम कोलकार, श्रीधर कांबळे, अरुण कोलकार यांच्यासह दलित संघटनांचे कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.