प्रतिनिधी/रत्नागिरी
शनिवार व रविवारी केवळ अत्यावश्यक सेवा सुरु राहणार असून जिह्यातील कोरोनाचे अधिक मृत्यू हे घाबरून झाले आहेत. आपण या रुग्णांच्या मागे ठामपणे उभे राहणे गरजेचे आहे. रुग्णांची मानसिकता कमी झाली तर रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. त्यामुळे या बाबत जनजागृती होणे गरजेचे आहे. तसेच 24 तास काम करणाऱया आरोग्य कर्मचारी व डॉक्टरांचे कोणत्याही प्रकारे खच्चीकरण करू नका. यामध्ये कोणीही राजकारण करू नये, असे मंत्री उदय सामंत यांनी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.
रत्नागिरीचा पॉझिटिव्हीटी रेट 10 च्या खाली येणे आवश्यक आहे. 7 हजार टेस्ट करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. रत्नागिरी पॉझिटिव्हीटी रेट 17.64 झाला आहे. यामध्ये काही परजिह्यातील रुग्ण आहेत. याची आकडेवारी वेगळी काढण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. तसेच नागरिकांनी वेळेत उपचारासाठी दाखल होऊन आरोग्य विभागाला सहकार्य करावे. आज जिह्यातील 65 गावे कोरोनामुक्त झाल्याचीही माहिती मंत्री सामंत यांनी पत्रकार परिषदेव्दारे शुक्रवारी दिली.
वॉर्डनिहाय लसीकरण मोहिमेचा लाभ नागरिकांना झाला आहे. जास्तीत-जास्त लसीकरण व्हावे, या मागे हेतू आहे. गावातूनही लसीकरण केले जाणार आहे. 65 गाव कोरोनामुक्त आहेत. या गावांचे प्राधान्याने लसीकरण केले जाणार आहे, असे सांगतानाच ग्रामीण भागातील 5000 पेक्षा जास्त लोकसंख्या असणाऱया गावातून मोबाईल लसीकरण केले जाणार असल्याचे सामंत यांनी सांगितले. 45 वर्षावरील नागरिकांना याचा लाभ मिळणार आहे. 18 ते 44 वयोगटातील लसीकरण लवकरात-लवकर सुरु होणार आहे. यामध्ये दुसरा डोसही सुरु झाला आहे, आजवर 320674 लसीकरण करण्यात आले.
महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या माध्यमातून सिंधुदुर्गला 10 व्हेंटिलेटर, राजापूर 3, सिव्हील 5, चिपळूण 6 अशा 24 व्हेंटिलेटरसह महाराष्ट्रात प्रत्येक जिह्याला ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर देण्यात आले. पावणेदोन कोटी रुपयांचे व्हेंटिलेटर देण्यात आले. खोकला, ताप अंगावर काढून जे नागरिक घरी राहतात, ते अतिगंभीर होतात. त्यामुळे मृत्यूचे प्रमाण वाढल्याची माहिती आरोग्य विभागाची आढावा बैठक घेतल्यावर समोर आल्याचेही सामंत यांनी सांगितले.
महिला रूग्णालयातील गोंधळाची माहिती घेणार
1 लाख लिटर पाणी नगरपालिका महिला रुग्णालयाला देते. तरीही काही गोंधळ आहे का, याची माहिती आपण घेणार आहोत. टँकर पाठवणाऱयाचेही कौतुक असल्याचेही मंत्री सामंत यांनी सांगितले.
जोखीमग्रस्त भाग सोडून इतर ठिकाणी कर्फ्यु नाही
हवामान खात्याच्या सूचनेनुसार खबरदारी जिल्हय़ात जोखीमग्रस्त भागात सतर्कतेची उपाययोजना करण्यात आली आहे. जीवितहानी होऊ नये म्हणून योग्य पद्धतीच्या सूचना विशेषतः चिपळूण, खेड व राजापूर येथे करण्यात आल्या आहेत. 3 नगरपालिका व ग्रामपंचायतींना काही भागात सावधगिरीच्या सूचना देण्यात आल्या आहेत, मात्र इतर भागात कर्फ्यु नाही, असेही सामंत यांनी सांगितले.