राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेला ‘आंदोलनजीवी’ हा शब्दप्रयोग अनेकार्थांनी वेगळा म्हणता येईल. श्रमजीवी, बुद्धिजीवी हे शब्द सकारात्मक अर्थाने वापरले जातात. परंतु, मोदी यांनी वापरलेल्या या विशेषणामध्ये उपहासात्मकता, उपरोधिकपणा ठासून भरलेला दिसून येतो. कृषी कायद्याविरोधातील शेतकऱयांच्या आंदोलनावर भाष्य करण्याच्या निमित्ताने या वाप्बाणातून मोदी यांनी साधलेला हा निशाणा आंदोलनाच्या कोनातून किती प्रभावी आहे, हा भाग अलाहिदा. परंतु, ही शब्दयोजना अफलातून ठरावी, अशीच. मोदी हे कुशल वक्ते आहेत. त्यांच्या वक्तृत्वाला धार आहे. नेमकी शब्दयोजना, त्यातील चढउतार व अचूक टायमिंग यात ते वाकबगार आहेत. नेतृत्वाबरोबर आपल्या या अमोघ अस्त्रांच्या बळावरच मोदींनी लोकसभेची दोन मैदाने मारली. अनेक राज्ये पादाक्रांत करीत अर्ध्याअधिक भारतात कमळ फुलविले. मात्र, त्याच मोदी यांनी शेतकरी आंदोलनावर मौन बाळगणेच पसंत केले. हा विलंब तर आंदोलन लांबण्यास कारणीभूत नाही ना, अशी शंका कुणासही यावी. मुळात पंतप्रधान आणि देशातील सर्वोच्च नेते म्हणून मोदी यांच्या शब्दाला वजन आहे. मोदींनी पुढाकार घेतला तर याप्रश्नी तोडगा निघणे शक्य होईल, अशी भूमिका मोदी यांचे राजकीय गुरु व राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनीच अलीकडेच मांडली होती. आता त्यानंतर मोदी सुस्पष्ट भूमिका घेतात, आंदोलन थांबवून शेतकऱयांना चर्चेचे आवाहन करतात, हे सूचक आणि महत्त्वपूर्ण होय. आंदोलन हे वकील, कामगार, विद्यार्थ्यांचे असो वा आणखी कुणाचेही, यात परजीवी आंदोलनजीवींची टोळी पडद्याआडून वा मागून कार्यरत असते. त्यामुळे या लोकांपासून दूर राहण्याचा सल्लाही मोदी देतात. तसे भाजपाचे आंदोलनाविषयीचे अनुभव भांडार मोठे आहे. काँग्रेसवाले म्हणतात, त्याप्रमाणे स्वातंत्र्यलढय़ात भाजपासाठी शीर्षस्थ असलेल्या विचारसरणीचे योगदान नसेलही. परंतु, स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देशातील विविध प्रश्नांवर ठामपणे भूमिका घेत व प्रसंगी आंदोलने छेडत जागल्याची भूमिका भाजपानेच निभावली आहे, हे कसे विसरता येईल? मागच्या 73 वर्षांचा विचार केला, तर जवळपास साडेपाच ते सहा दशके या देशात काँग्रेसचीच सत्ता राहिली आहे. त्यामुळे तसा या मंडळींना आंदोलनाचा अनुभव कमीच. फुलटॉसवरही ज्यांना धाव घेता येत नाही, त्यांची विरोधाची धार काय, हे देशाला सध्या दिसतेच आहे. म्हणून तसा आंदोलनाच्या पातळीवर विचार केला, तर अधिक प्रगल्भ व अनुभवसिद्ध भारतीय जनता पक्षच. स्वाभाविकच त्यातील खाचाखोचा, सेटिंग-बेटिंग या पक्षासच अधिक ज्ञात असणार. मोदींचा ‘आंदोलनजीवी’ शब्दप्रयोगही या अनुभूतीतूनच आला असण्याची शक्यता जास्त. आंदोलन कितीही गंभीर असो. त्यात थोडय़ा फार हवशा, नवशा, आणि गवशांचाही समावेश असतो, हेच मोदींना ध्वनित करायचे असावे. त्या अर्थी त्यांनी वापरलेला शब्द शेरेबाजीच्या पातळीवर योग्य असेलही. किंबहुना, वास्तवात अशा कुणाच्या ‘जीवा’वर फार काळ आंदोलने चालत नसतात, हेही लक्षात घ्यायला हवे. त्यासाठी निश्चित व्हिजन व इरादे पक्के लागतात. आता शेतकरी आंदोलन पंजाब, हरियाणापुरते सीमित राहिले नसून, उत्तरेत अनेक ठिकाणी त्याचे लोण पसरले आहे. त्यामुळे आता केवळ कोटय़ा करून प्रश्न मिटणार नाहीत, तर ठोस भूमिका घ्यावी लागेल. पंतप्रधान कायद्यावर ठाम दिसतात तर एमएसपी आहे नि राहणार, असा शब्दही देतात. परंतु, निव्वळ शाब्दिक फुलबाजे नकोत. हमीभावाचा कायदा आणणार का ते सांगा, असे शेतकरी नेते राकेश टिकैत म्हणतात. हमी भाव केवळ तोंडी हमीवर कसा चालेल? त्याला कायद्याचे कोंदण हवेच, ही मागणी तशी शेतकरी आणि शेतकऱयांच्या दृष्टीने व्यवहार्यच म्हणता येईल. देशात अन्नधान्य तुटवडा निर्माण झाला, तेव्हा हरितक्रांतीने देशाची भूक भागविली. कोरोना पर्वात शेतीमुळेच मानवी जीवनाबरोबरच अर्थकारणाच्याही ‘जीवात जीव’ आला. हे सारे पंतप्रधान जाणतात. त्यामुळे पुढच्या टप्प्यात शब्दांचे हे किमयागार आपल्या जादुई नेतृत्वबळावर आंदोलक शेतकऱयांचे समाधान करण्यात यशस्वी होतात का याबाबत उत्सुकता असेल. आंदोलनजीवीबरोबरच ‘आत्मनिर्भरता’ हा मोदी यांच्या वाणीतून आलेला आणखी एक नवनवोन्मेषी शब्द. कोरोनाच्या संकटात मरगळलेल्या मनांना उभारी देण्यासाठी त्यांनी योजलेल्या या शब्दास ऑक्सफर्ड डिक्शनरीत स्थान मिळणे, यातच सर्व आले. वास्तविक असे शब्द पेरणे, प्रलचित करणे व त्याभोवती चर्चा फिरवित ठेवणे, ही मोदींच्या नेतृत्वाची खरी जादू आहे. ‘आत्मनिर्भरता’ म्हणजे स्वावलंबन. किंबहुना, या शब्दाचा इतका मारा केला गेला, की त्यातील आत्मनिर्भर जीवनमान अधोरेखित होण्यापेक्षा शाब्दिक वा छापील बोलणेच ठाशीव होत गेले. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत ‘अच्छे दिन’ या मोदींच्या दोन शब्दांनी नटलेल्या घोषणेने मतदारांवर कशी मोहिनी घातली, हे साऱया जगास ठाऊक आहे. अच्छे दिन येवोत, न येवोत. परंतु, हा शब्द लोकमनावर ठसला. हे ठसणे नि ठसवणे, ही किमया आहे. ती मोदींना चांगली साधते. या खेपेला ‘आंदोलनजीवी’ या नकारात्मक शब्दातून ते एकप्रकारे आंदोलननीतीलाच विरोध दर्शवितात. परजीवी म्हणजे दुसऱयाच्या जीवावर जगणारे. तसे हे आंदोलनजीवी केवळ आंदोलनावर जगणारे, या मांडणीतून त्यांच्यातील सत्ताधारी उठून दिसतो नि भूतकाळाचे मात्र पद्धतशीर विस्मरण होते. वास्तविक, लोकशाहीत आंदोलन, विरोध याचे महत्त्व मोठे आहे. सरकारने कोणताही निर्णय घ्यावा, कायदे करावेत, फायद्यातील उद्योगांचेही खासगीकरण करावे नि विरोधी पक्षासह सर्वांनीच केवळ माना हलवाव्यात, अशा ‘हो’कायंत्री भूमिकेने जनतंत्र कसे मजबूत होईल? आंदोलनाला वैचारिक पाया व नैतिक अधिष्ठानही हवेच. तथापि, सरकारच्या भूमिका वा धोरणांमध्येही ते असायला पाहिजे. त्यातूनच शब्द खऱया अर्थाने ‘सजीव’ होतील.
Previous Articleपंतप्रधान मोदी-बायडन यांच्यात चर्चा
Next Article ‘रिव्हर्स स्विंग’ जिंकले, विराटसेना हरली!
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.