वृत्तसंस्था/ डोहा
भारताचे टेबल टेनिसपटू शरथ कमल आणि मनिका बात्रा यांनी येत्या जुलै महिन्यात होणाऱया टोकियो ऑलिंफिकसाठी आपले तिकीट आरक्षित केले आहे. टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत आता शरथ कमल आणि मनिका बात्रा हे टेबल टेनिस प्रकारातील मिश्र दुहेरीत भारताचे प्रतिनिधीत्व करतील. येथे शनिवारी झालेल्या आशियाई पात्र फेरीच्या टेबल टेनिस स्पर्धेत शरथ कमल आणि मनिका बात्रा यांनी मिश्र दुहेरीचे जेतेपद पटकाविले. 2018 च्या आशियाई स्पर्धेत कास्यपदक मिळविणाऱया शरथ कमल आणि मनिका बात्रा यांनी मिश्र दुहेरीच्या अंतिम सामन्यात कोरियाच्या टॉप सीडेड सेंग ली आणि जेऑन यांचा 8-11, 6-11, 11-5, 11-6, 13-11, 11-8 अशा सेट्समध्ये पराभव करत विजेतेपद पटकाविले. ही अंतिम लढत चुरशीची झाली. या सामन्यात पहिले दोन सेट्स गमविल्यानंतर शरथ आणि मनिका यांनी पुढील सलग चार सेट्स जिंकून कोरियाच्या टॉप सीडेड जोडीचे आव्हान संपुष्टात आणले. भारताचा शरथ कमल हा पुरूष एकेरीत जी सत्येनसह ऑलिंपिकसाठी पात्र ठरले आहेत. आता टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत भारताचे पाच स्पर्धक सहभागी होणार आहेत. पुरूष आणि महिला एकेरीत प्रत्येकी दोन तर मिश्र विभागात एक स्पर्धक पात्र ठरला आहे.