ऑनलाईन टीम/तरुण भारत
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्तुतीसुमनं उधळी आहेत. बुधवारी मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रशासनावर चांगली पकड आहे आणि येथेच त्यांची बाजू खूप मजबूत आहे असं म्हणत त्यांनी मोदींच कौतुक केलं.
शरद पवार यांनी पंतप्रधानांच्या कार्यशैलीचे कौतुक केले आणि ते म्हणाले की, त्यांनी एखादे काम सुरू केले की ते पूर्ण करणे सुनिश्चित असते. पवार म्हणाले, मोदी खूप मेहनत घेतात आणि काम पूर्ण करण्यासाठी पुरेसा वेळ देतात. ते म्हणाले की मोदींचा स्वभाव असा आहे की त्यांनी एखादं काम हाती घेतले की ते (काम) पूर्ण होईपर्यंत थांबणार नाही याची ते काळजी घेतात.
तसेच पंतप्रधान त्यांच्या सरकारच्या धोरणांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी प्रशासन आणि त्यांचे सहयोगी कसे एकत्र येऊ शकतात यावर भर देतात. मित्रपक्षांना सोबत घेण्याची मोदींची पद्धत वेगळी आहे आणि ती शैली मनमोहन सिंह यांच्यासारख्या माजी पंतप्रधानांमध्ये नव्हती.
पवार म्हणाले की, नरेंद्र मोदी गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री असताना यांच्या विरोधात सूडाचे राजकारण खेळू नये, असे माझे आणि तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह यांचे मत होते. मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना मी केंद्रात होतो. जेव्हा पंतप्रधान सर्व मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावत असत, तेव्हा मोदी भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या गटाचे नेतृत्व करायचे आणि केंद्रावर हल्ला करायचे. अशा स्थितीत मोदींना कसे प्रत्युत्तर द्यायचे याची रणनीती आखण्यात येत होती. माझ्याशिवाय यूपीए सरकारमध्ये मोदींशी बोलू शकणारा दुसरा मंत्री नव्हता कारण ते मनमोहन सिंह सरकारवर सतत हल्लाबोल करत असत.