मुंबई \ ऑनलाईन टीम
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बारामतीतील गोविंद बाग निवास्थानी सुरक्षा वाढवण्यात आली आहे. निवासस्थानाच्या चहुबाजूंनी पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. उजनीच्या पाणीप्रश्नी सोलापुरमधील शेतकरी आंदोलन करणार आहेत. हे आंदोलन शरद पवार यांच्या निवासस्थानाबाहेर होणार आहे.
उजनीचा पाणीप्रश्न गेल्या काहिदिवासंपासून शेतकरी आंदोलकांनी लावून धरला आहे. इंदापुर आणि सोलापूरमधील शेतकऱ्यांनी गेल्या काहिदिवसांपासून आंदोलन सुरु केले आहे. यापुर्वी इंदापुरमध्ये या शेतकऱ्यांनी रास्तारोको आंदोलन केले होते. आज बुधवार २६ मे रोजी सोलापुरचे शेतकरी बारामतीतील शरद पवारांचे निवासस्थान गोविंद बाग येथे आंदोलन करणार आहेत, अशी माहिती बारामती पोलिसांना मिळाली होती. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शरद पवारांच्या निवासस्थानी सुरक्षा वाढवली आहे.
उजनी पाणी प्रश्न काय आहे ?
उजनी धरणाच्या ५ टीएमसी पाण्यावरुन शेतकऱ्यांनी आंदोलन सुरु केले आहे. सांडपाणी योजनेंअंतर्गत उजनी धरणातून ५ टीएमसी पाणी इंदापूरला देण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. या निर्णयाला सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. सोलापूरचे पाणी इंदापूरला न देण्याचा आदेश जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी रद्द करत असल्याचे फक्त तोंडी सांगितले होते. परंतु अद्याप तसे पत्रक जारी करण्यात आले नाही. यामुळे तो निर्णय तातडीने रद्द करण्यात यावा अशी मागणी सोलापूरच्या शेतकऱ्यांनी केली आहे. निर्णय रद्द न केल्यास शरद पवारांच्या गोविंद बाग निवासस्थानासमोर आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला होता.