ऑनलाईन टीम / मुंबई
स्वबळाच्या नाऱ्यावरुन काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात गेल्या काही दिवसांपासून कलगीतूरा रंगला आहे. यातच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आघाडीत बिघाडी असे वक्तव्य केले होते. यावेळी त्यांनी अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली होती . यावरुन शरद पवार यांना प्रश्न विचारला असता. नाना पटोले सारख्या लहान माणसावर मी बोलणार नाही. हेच वक्तव्य सोनिया गांधी यांनी केले असते, तर ते दखल घेण्यास पात्र होते, असे म्हटले आहे. शरद पवार यांच्या याच वक्तव्यावरुन भाजप नेते निलेश राणे यांनी पटोले यांच्यावर निशाणा साधला आहे.
निलेश राणे यांनी ट्विट करत पटोले यांच्यावर अरे रे रे… पवार साहेब कधी कधी वाटतं तुम्ही काही लोकांची लायकी खूप चांगली ओळखता. नाना पटोले आत्ता कुठे स्वतःला मुख्यमंत्री पदाच्या स्पर्धेत बघू लागले होते की पवार साहेबांनी त्यांना पान टपरी वालाचं करून टाकला. अशा जहरी शब्दात टीका केली आहे. गेल्या काही दिवसांपासून राणे बंधुंनी विविध मुद्यांवर महाविकास आघाडीवर टीकेची झोळ उठवली आहे.