प्रतिनिधी / सातारा
साताऱ्यात आज मराठा आरक्षणाबाबत गोलमेज परिषदेचे आयोजन करण्यात आले.या गोलमेज परिषदेला पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख समन्वयकांची उपस्थिती होती. त्याचबरोबर सातारा भाजपाचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनीही हजेरी लावली. सुप्रीमकोर्टाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर मराठा आरक्षणाचे वातावरण तयार झाले त्यामुळे मराठा तरुणांमध्ये उदासिनता आणि नाराजी निर्माण झाली. शासनाने पोलीस भरती आणि एमपीएससी परीक्षेबाबत घाईगडबड करु नये. अशी गोलमेज परिषदेच्या माध्यमातून आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी सरकारकडे मागणी केले आहे. आरक्षणाच्या मुद्यावरती सर्वांनी एकत्र येऊन हा लढा उभा करणे गरजेचं आहे.
वेगवेगळे लढलो तर इतिहासाची पुनरावृत्ती होईल असे मत आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी व्यक्त केले. ज्यांना मराठा आरक्षण प्रश्नाचे आणि प्रशासनाचे ज्ञान आहे. अशा लोकांनी एकत्र येऊन हा लढा पुढे नेहुन सुप्रीम कोर्टाची स्थगिती उठवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
याठिकाणी मी आमदार किंवा राजघराण्यातील व्यक्ती म्हणून आलो नसून मराठा म्हणून आलो आहे. ओबीसी समाजाने घाबरुन जाऊ नये. त्यांचं आरक्षण काढून आम्हाला द्या अशी मागणी मराठा समाजाची नसून शरद पवारांसह केंद्रातील सर्वच नेत्यांनी मराठा आरक्षणावर लक्ष घालणे गरजेचे आहे. त्याशिवाय मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाही असे मत आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी यावेळी व्यक्त केले.