पंढरपूर / प्रतिनिधी
महाराष्ट्रातील धनगर समाजाच्या आरक्षणावर शरद पवारांना केवळ राजकारण करायचे आहे. आज पर्यंत अनेक बहुजन समाजावर पवारांनी अत्याचार केले. हे नेतृत्व राज्याचे असू शकत नाही. त्यामुळे शरद पवारच महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे. अशी बेधडक टिका आ. गोपीचंद पडळकर यांनी केली.
आमदार पडळकर हे आज पंढरपुरात आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. प्रसंगी पुढे बोलताना आ. पडळकर म्हणाले , धनगर आरक्षणाच्या प्रश्नावर मागील सरकारने एक हजार कोटींची तरतूद केली होती. मात्र या सरकारने अर्थसंकल्पात कसलीही तरतूद धनगर समाजासाठी केली नाही. त्यामुळे धनगर समाज केवळ राजकारणासाठी पवाराना लागतो. तसेच विधानसभा निवडणुकीनंतरचा नाशिक येथील अवकाळी पाऊस असो किंवा कोकणात वादळी वाऱ्याने झालेले नुकसान असो. या दोन्ही प्रसंगात शरद पवार पाहणी दौऱ्याला गेले. पण त्या ठिकाणच्या लोकांना दमडीचीही मदत मिळाली नाही. त्यामुळे पवारांचे नेतृत्व केवळ राजकारण करण्यापुरते मर्यादित आहे. असेही ते यावेळी म्हणाले.
तसेच आषाढी यात्रेला वारकरी महाराज मंडळी पंढरपुरात येणार नाहीत. अशावेळी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी समजूतदारपणाची भूमिका दाखवत एका सामान्य वारकरी भक्ताला महापूजेचा मान द्यावा. मुख्यमंत्र्यांनी मुंबईतून विठोबाची पूजा करावी. जेणेकरून कोरोनामुक्तीच्या लढा महाराष्ट्राला देखील एक चांगला संदेश दिला जाईल. असे सांगता आ.पडळकर यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना पंढरपुरात आषाढीला विठोबाच्या महापूजेला येऊ नये. असा एकप्रकारे सल्लाच दिला आहे.