मुंबई \ ऑनलाईन टीम
महाविकासआघाडी सरकारमध्ये नाराजी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. काँग्रेसचं एकला चलो रे चा नारा असो, म्हाडाच्या सदनिकांबाबतचा निर्णय मागे घेणे असो किंवा इतर मुद्द्यांवरुन महाविकास आघाडीत मतभेद असल्याच्या चर्चा सुरु आहेत. या सगळ्या चर्चा सुरू असताना शिवसेना नेते संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. यानंतर संजय राऊत यांनी महाविकास आघाडी सरकारमध्ये सर्व काही आलबेल असल्याचा दावा केला. आता यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर पोहोचले आहेत. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड हे देखील वर्षा बंगल्यावर पोहोचले आहेत.
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे हे सुद्धा वर्षावर उपस्थित आहेत. राष्ट्रवादीचे दिग्गज नेते वर्षा बंगल्यावर दाखल झाल्यानंतर तासाभराने स्वत: शरद पवारही वर्षा बंगल्यावर दाखल झाले आहेत. इथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत महत्त्वाची बैठक होत असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची तीन दिवसात दोन वेळा भेट घेतली. संजय राऊत सोमवारी वर्षा निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्र्यांना भेटले. त्यानंतर तिथूनच संजय राऊत हे शरद पवारांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओकवर दाखल झाले. दरम्यान, आज संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना अनिल देशमुख यांच्याविषयी मुख्यमंत्र्यांशी बोललो. अनिल देशमुख यांची एक बाजू आहे. ती समजून घेतली पाहिजे, असं म्हणाले.