बेंगळूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांची भेट घेऊन चर्चा केली. कर्नाटक आणि महाराष्ट्रातील पाणीवाटप आणि पूरपरिस्थितीबाबत उभयतांमध्ये चर्चा झाली. दोन्ही राज्यांमधील पाणीवाटपाच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी लवकरच बैठक बोलविण्यास उभय नेत्यांनी संमती दर्शविली. नवी दिल्ली येथे दोन्ही राज्यांचे पाटबंधारे मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱयांची बैठक आयोजित करण्याची तारीखही यावेळी ठरविण्यात आल्याचे समजते.
जयंत पाटील यांनीही घेतली भेट
महाराष्ट्राचे पाटबंधारे मंत्री जयंत पाटील यांनी देखील शुक्रवारी राज्याचे नूतन मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांची मुख्यमंत्र्यांचे बेंगळूरमधील गृहकार्यालय ‘कृष्णा’ भेट घेतली. त्यांनी कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यांमधील पाणीवाटपासंबंधीच्या मुद्दय़ावर उभयतांमध्ये चर्चा झाली. महाराष्ट्रातील पूर नियंत्रणासाठी कर्नाटकाने तातडीने आलमट्टीतून विसर्ग केल्याबद्दलही जयंत पाटील यांनी सरकारचे आभार मानले.
जयंत पाटील यांच्याशी चर्चा केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना बोम्माई म्हणाले, दोन्ही राज्यात पूर नियंत्रण व पुरामुळे झालेल्या नुकसानीविषयी चर्चा केली आहे. दूधगंगा, कृष्णाकाठ योजनेच्या तिसऱया टप्प्याविषयीही यावेळी चर्चा करण्यात आली आहे.