मुंबई / ऑनलाईन टीम
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी होमगार्ड प्रमुख परबीर सिंग यांच्या लेटरबॉम्बवर आज पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. सिंग यांनीच पोलीस सहायक सचिन वाझे यांची निवड केल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या याच मुद्द्यावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत महाविकासआघाडी सरकारवर निशाणा साधला. शरद पवार हे अर्धसत्य सांगत आहेत. यात त्यांना काही मी दोष देणार नाही. कारण ते या सरकारचे निर्माते आहेत. निर्मात्यांना आपलं सरकार कसंही वागलं तरी ते वाचवण्याची भूमिका घ्यावी लागते, असा टोला देखील फडणवीस यांनी लगावला.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, हे सगळं प्रकरण अत्यंत धक्कादायक आहे. विशेष म्हणजे अशाप्रकारचा खुलासा करणारे परमबीर सिंग हे पहिले व्यक्ती नाहीत. या पूर्वी महाराष्ट्राचे डीजी सुबोध जयस्वाल यांनीही या संदर्भातला एक रिपोर्ट राज्य सरकार आणि मुख्यमंत्र्यांकडे सादर केलाय. पोलिसांच्या बदल्याचे रॅकेट, पैशांची देवाणघेवाण, त्यातील दलाली या संदर्भातील संपूर्ण माहिती तत्कालीन पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यांनी सादर केला होता. तो रिपोर्ट मुख्यमंत्र्यांकडे, त्यानंतर गृहमंत्र्यांकडे गेला होता. पण त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही .
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, मी शरद पवार यांची पत्रकार परिषद बघितली. पण सुबोध जयस्वाल, रश्मी शुक्ला यांची बदली नव्हती. त्यांनी पुराव्याच्या आधारावर या सरकारकडे जो रिपोर्ट सादर केला होता त्याचवेळी उचित कारवाई झाली असती तर आज ही वेळ आली नसती. पवारांची पत्रकार परिषद ऐकल्यानंतर मला आश्चर्यही वाटलं. पण त्यांना दोष देणार नाही. ते या सरकारचे निर्माते आहेत. निर्मात्यांना आपलं सरकार कसंही वागलं तरी ते वाचवण्याची भूमिका घ्यावी लागते. त्यांनी ज्यावेळी सांगितले वाझे यांना परमबीर सिंग यांनी घेतलं. ते खरंच आहे. परमबीर सिंग यांच्या समितीत अनेक लोक होते. त्या समितीने निर्णय घेतला. त्यानंतर रिइंस्टेट करण्यात आलं. पण रिइंस्टेट केल्यानंतर त्यांना महत्त्वाची जागा देण्यात आली. तेव्हा सरकार झोपलं होतं का? सरकारला, मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांना नियम नाही माहिती?
सगळ्या महत्त्वाच्या केसेस या त्यांच्याकडेच देण्यात आलं. हे सरकारच्या आशीर्वादाशिवाय झालं. पवार सांगतात ते खरंय. पण ते अर्धसत्य आहे. परमबीर सिंग यांच्याच समितीने वाझे यांना पदावर घेतले. पण मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांच्या आशीर्वादाने त्यांनी हा निर्णय घेतला. एपीआय दर्जाचा व्यक्ती हा इतक्या महत्वाच्या पदावर गेला आणि नंतर त्यांनी काय केलं हे आपण सर्वांनी पाहिलं आहे.” असं देखील फडणवीस म्हणाले.