ऑनलाईन टीम / पंढरपूर :
शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे, अशी टीका भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली. तसच शरद पवार यांनी बहुजन समाजावर अन्याय केला असा आरोप देखील त्यांनी यावेळी केला.
शरद पवार हे या महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे. कारण गेल्या अनेक वर्षापासून ते महाराष्ट्राचं नेतृत्त्व करतात. राज्यातील बहुजनांवर अत्याचार करण्याची भूमिका त्यांची राहिलेली आहे. ही भूमिका यापुढेही ते कायम ठेवतील, असं गोपीचंद पडळकर यांनी म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी गोपीचंद पडळकर यांनी तोंड सांभाळून बोलावे असे म्हटले आहे.
– राष्ट्रवादी काँग्रेसचे उद्या पुण्यात आंदोलन
गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या टीकेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे. पुणे राष्ट्रवादी काँग्रेसने उद्या आंदोलनाची हाक दिली आहे.
याबाबत बोलताना राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी सांगितले की, गोविंद पडळकर यांनी शरद पवार साहेब यांच्याबाबत अतिशय वाईट भाषेत वक्तव्य केले आहे. राजकारणात मतभेद असू शकतात मात्र इतक्या खालच्या पातळीवर येऊन वक्तव्य करणे असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे. पुढे ते म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते गुरुवारी सकाळी दहा वाजता मंडई येथील लोकमान्य टिळक पुतळ्याजवळ आंदोलन करणार आहेत.