सुधाकर काशीद / कोल्हापूर
बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठली, आता शर्यतीचा धुरळा उडेल हा झाला सारा पुढचा भाग आहे. पण शर्यतीच्या सात वर्ष बंदीच्या काळात शर्यतीची बैलं कशी जपली गेली, हे फक्त त्या बैलांना जपणार्यांनाच माहित आहे. आता शर्यतीची शक्यता धूसर होते, असं वाटल्यावर या बैलांना कोणी वार्यावर सोडले नाही. उलट आठ, दहा लाख रुपये किंमत असणार्या या बैलांना कोणत्याही कामाच्या रगाड्यात न जुपता पौष्टिक खाद्य देऊन जपली गेली. आता बंदी उठल्याने ही बैलं पुन्हा राऊंडासाठी फुरफुरु लागली आहेत. शर्यत शौकिनांच्या भाषेत शर्यतीला राऊंड असे म्हटले जाते.
यातला शर्यत कायदेशीर की बेकायदेशीर हा भाग वेगळा. पण शर्यतीचा शौकीन असलेला एक मोठा घटक या शर्यत बंदीच्या काळात बैलांना आपल्या कुटुंबाचा घटक समजूनच जपत राहिला. बैल पोसणे ही सहज साधी गोष्ट अजिबात नाही. पण त्या शर्यतीच्या बैलांना रोज दोन-तीन लिटर दूध, सातू, मटकी, हरभरे ,उडीद असा पौष्टिक आहार चालू ठेवला गेला. आता शर्यती सुरू झाल्यामुळे त्यातून रोख बक्षिसे मिळवून ही बैलं त्याची किती परतफेड करतील हे माहित नाही. पण शर्यत बंदीच्या काळात फुकटचा भार म्हणून या बैलाकडे कोणीही पाहिले नाही.
कोल्हापूर जिह्यात बैलगाडी शर्यत शौकिनांची संख्या खूप मोठी आहे. त्यात शर्यतीच्या बैलांचे मालक हा एक मोठा घटक आहे. कारण शर्यतीचा बैल पोसणे म्हणजे कसोटीच असते. पण एकदा या बैलांचा लळा लागला की त्यांना काही जणांकडून अक्षरशः पदरमोड करून जपले जाते. शर्यतीचा बैल म्हणजे शेतीसाठी तसा बिन कामाचा. पण शर्यतीच्या मैदानात तो उतरला तर लाखो शौकिनांच्या नजरा त्याच्यावर खिळून रहातात. त्याने शर्यत जिंकली तर कौतुकाचा वर्षाव होतो. त्यामुळे बैल पोसण्यासाठी जेवढा खर्च झाला तेवढा खर्च बक्षिसाच्या रकमेतून मिळत नसला तरीही बैल पोसण्याची एक आगळी नशाच कोल्हापूर जिह्यात भिनली आहे.
या बैलांचा दर लाखात आणि लाखाच्या पटीत आहे. हे सारे बैल खिलारी जातीचे. इतर बैल शेतीच्या कामाला. पण शर्यतीचे हे बैल फक्त शर्यतीलाच. त्यामुळे त्यांना जपण्यासाठी मालकांची एक यंत्रणाच राबत असते. या बैलांना हिरवे गवत तर आहेच. पण या बैलांना रोज दोन-तीन लिटर दूध पाजावे लागते. याशिवाय धान्य कडधान्य, भरड हे खाद्य वेगळेच असते. या बैलाला शर्यतीच्या सरावाला अधून मधून नेले जाते. त्याला मॉलीश केले जाते. अतिशयोक्ती अजिबात नाही. पण त्यांना डास चिलटे चावणार नाहीत याची पूर्ण दक्षता घेतली जाते. शर्यतीला नेताना या बैलांना खास टेम्पोतून नेले जाते. बैलाला शर्यतीला नेताना व परत आल्यावर त्यांची मीठ मिरच्या ओवाळून दृष्ट काढली जाते.
शर्यत बंदीच्या काळात ही बैलं गोठ्यात थांबून होती. पण तरीही सराव म्हणून त्यांना अधून मधून बाहेर काढले जात होते. पहाटे पहाटे काही ठिकाणी चोरून होणार्या शर्यतीत बैलाचे अंग हालते रहावे म्हणून मुद्दाम सहभागीही केले जात होते. पण त्याचे प्रमाण कमी होते. शर्यतीचे प्रकरण थेट सर्वोच्च न्यायालयात असल्याने निकालाकडे सर्व शौकिनांचे लक्ष लागून राहिले होते. आता सर्वोच्च न्यायालयाने शर्यतींना परवानगी दिली आहे. त्यामुळे शर्यत शौकीनांत एक वेगळेच वातावरण आहे. आणि शर्यतीची बैलही पहिल्या राऊंडासाठी फुरफुरू लागली आहेत.
कोल्हापुरात धोंडीराम गाडगीळ यांचे शर्यतीचे बारा बैल आहेत. याशिवाय विजय बेडेकर, गोगा पाटील, संदीप पाटील ,सर्जेराव शिंदे, दाजी पाटील, पांडुरंग नाईकवाडे, पापा दिवसे, अनिल निकम, शंकर ढेरे, नितीन संकपाळ, अण्णा घाडगे, आनंदा माऊली, प्रफुल्ल संकपाळ, सोमनाथ मंडले, राजू कवठे, बंडा खिलारे, बाबुराव मोहिते, रंगा ढेरे, धनपाल पोमाजे ही सारी मंडळी बैलगाडी क्षेत्रातील दिग्गज आहेत.
बैलगाडी शर्यत सुरू व्हावी याच प्रतीक्षेत आम्ही होतो. शर्यत सुरू होणार की नाही याचा नेमका अंदाज नव्हता. तरीही कोल्हापूर जिह्यातील अनेकांनी शर्यतीची बैलं विकली नाहीत. या बैलांना आम्ही कुटुंबाचा घटक म्हणूनच जपले. सर्वोच्च न्यायालयाचा मान राखूनच आम्ही शर्यतीत सहभागी होऊ
– संदीप पाटील