नवी दिल्ली
अफगाणिस्तान आणि भारत यांच्यात मंगळवारी आयोजित आभासी परिषदेत एक महत्त्वाचा करार करण्यात आला आहे. यांतर्गत भारत काबुलच्या नदीवर शहतूत धरणाची निर्मिती करणार आहे. या प्रकल्पामुळे तेथील लोकांना सहजपणे स्वच्छ पेयजलासह सिंचनाची सुविधा उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पासाठी दोन्ही देशांच्या विदेशमंत्र्यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे. अफगाणिस्तानचे अध्यक्ष अशरफ गनी यांनीही या करारावर आनंद व्यक्त केला आहे. शहतूत जलसाठय़ासह आम्ही नैसर्गिक सौंदर्य बहाल करण्याच्या आमच्या लक्ष्याची पूर्तता करू शकू. लसीसोबत पाण्याच्या या भेटीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानतो असे उद्गार गनी यांनी काढले आहेत. पंतप्रधान मोदी आणि अफगाणिस्तानचे अध्यक्ष गनी यांनी मंगळवारी पार पडलेल्या आभासी परिषदेत भाग घेतला आहे. दोन्ही देशांच्या सर्वोच्च नेत्यांसह विदेशमंत्री एस. जयशंकर आणि अफगाणचे विदेशमंत्री मोहम्मद हनीफ अतमर यांनीही यात सहभाग घेतला. अफगाणिस्तानच्या अध्यक्षांनी भारताकडून देण्यात आलेल्या कोविड-19 लसीसाठी आभार मानून त्याला अनमोल भेट संबोधिले आहे. भारत आणि अफगाणिस्तानच्या मैत्रीच्या दीर्घ वाटेत आणखी एक मैलाचा दगड आज रोवत आहोत. भारत आणि अफगाणिस्तान केवळ भौगोलिकच नव्हे तर इतिहास आणि संस्कृतीतही परस्परांशी जोडलेले राहिले आहेत. परस्परांना प्रभावित करत राहिल्याचे उद्गार मोदींनी काढले आहेत.
शहतूत धरणामुळे काबुलच्या 20 लाख लोकांना स्वच्छ पेयजलाच सुविधा मिळणार आहे. तसेच याच्या मदतीने शेतीत सिंचनाची व्याप्ती वाढणार आहे. काबूलच्या नदीवर हे धरण उभारण्यात येणारा आहे. शहतूत धरणाच्या व्यतिरिक्त भारताने अफगाणिस्तानात 80 दशला डॉलर्सच्या प्रकल्पांची निर्मिती करण्याचे आश्वासन दिले आहे. शहतूत धरणासह युद्धग्रस्त देशात सुमारे 150 प्रकल्प निर्माण करण्याची घोषणा भारताने केली आहे.