प्रतिनिधी /बेळगाव :
कोरोनामुळे महापालिका कार्यालयाचे काम ठप्प झाले होते. मात्र कार्यालयीन कामकाज सुरळीत झाल्यानंतरही नागरिकांची कामे तसेच शहरातील समस्यांचे निवारण होत नसल्याच्या तक्रारी होत आहेत. पथदीप, रस्ते, ड्रेनेज आणि स्वच्छतेबाबत वारंवार तक्रारी करूनही अधिकाऱयांचे दुर्लक्ष झाले आहे. महापालिका आयुक्तांचा वचक ढिला झाल्याने मनपातील अधिकाऱयांचा मनमानी कारभार सुरू असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत.
कोरानामुळे महापालिका कार्यालयाचे कामकाज थंडावले आहे. मनपाच्या अधिकारी व कर्मचाऱयांवर विविध जबाबदाऱया सोपविण्यात आल्याने कार्यालयीन कामकाज ठप्प झाले होते. मात्र लॉकडाऊन शिथिल करण्यात आले असून मनपा कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱयांवरील क्वारंटाईनची जबाबदारी कमी करण्यात आली आहे. त्यामुळे ऑगस्ट महिन्यापासून मनपा कार्यालयाचे काम सुरळीत सुरू झाले आहे. पण कोरोना डय़ुटीवर असलेले अधिकारी व कर्मचारी आजारी असल्याने तसेच विविध विभागातील कर्मचाऱयांना कोरोनाची लागण झाल्याने ऑगस्ट महिन्यात कार्यालयातील कामकाज सुरळीत झाले नाही. सध्या शहरात कोरोनाचा प्रसार वाढत चालला आहे, मात्र कोरोनाच्या धास्तीने घरी किती दिवस बसणार, असा मुद्दा उपस्थित झाल्याने नागरिक घराबाहेर पडू लागले आहेत.
शहरातील रस्त्याची अक्षरश: चाळण
महापालिका कार्यालयात विविध कामासाठी नागरिकांची गर्दी वाढू लागली आहे. तसेच लॉकडाऊनमुळे महापालिकेच्यावतीने कोणतीच विकासकामे राबविण्यात आली नाहीत. यामुळे शहरातील रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. स्मार्ट सिटीअंतर्गत रस्त्याचे काम करण्यात येणार असल्याचे सागून रस्त्याची दुरुस्ती करण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले असून वाहनधारकांना खड्डेमय रस्त्यावरून प्रवास करावा लागत आहे. असंख्य रस्त्यावर मोठमोठे खड्डे निर्माण झाल्याने अपघात घडत आहेत.
तसेच शहरातील पथदिपाची दुरवस्था झाली असून शहर आणि उपनगरातील प्रत्येक रस्त्यावरील पथदीप बंद अवस्थेत आहेत. पथदिपांबाबत महापालिकेकडे वारंवार तक्रार करण्यात आली, पण याची दखल घेण्यात आली नसल्याने पथदीप बंद अवस्थेत आहेत. हायमास्ट आणि पथदीप बंद असल्याने याची दुरुस्ती करण्याकडे कंत्राटदारानेदेखील दुर्लक्ष केले असल्याने अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे नागरिकांनी व माजी नगरसेवकांनी महापालिका आयुक्त जगदीश के. एच. यांच्याकडे तक्रारी केल्या. पण याची दखल घेण्यात आली नाही. यामुळे प्रत्येक रस्त्यावर अंधार पसरला आहे. तसेच कचऱयाची उचल व्यवस्थित होत नसल्याने ठिकठिकाणी कचऱयाचे ढिगारे साचले आहेत. विशेषतः टिळकवाडी परिसरातील कचऱयाची उचल वेळेवर होत नसल्याच्या तक्रारी वारंवार होत आहेत. तसेच गटारीची स्वच्छता आणि कचऱयाची उचल करण्याकडे कानाडोळा करण्यात आला आहे. पथदीप, स्वच्छता आणि रस्त्याची दुरुस्ती करण्याच्या तक्रारी करण्यात आल्यानंतरही याची दखल महापालिकेकडून घेण्यात येत नाही.
नागरिकांना महापालिकडेकडून नागरी सुविधा उपलब्ध होत नसल्याने शहरवासियांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अधिकाऱयांनी याकडे कानाडोळा केला असून महापालिकेच्या अधिकाऱयांवर मनपा आयुक्तांचा वचक नसल्याने शहरवासियांना समस्यांचा सामना करावा लागत असल्याचा आरोप होत आहे. महापालिका आयुक्तांचेदेखील दुर्लक्ष झाले असून आयुक्त केवळ बैठकांमध्ये व्यस्त रहात असल्याने नागरिकांच्या समस्या कधी सोडविणार, असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे.