प्रतिनिधी / कोल्हापूर
शहरातील काही प्रभागात अनियमित पाणी पुरवठा होत आहे. अपुऱया पाणीपुरवठय़ावरुन नागरिकांमध्ये संतप्त भावना आहेत. या संतप्त भावनांचे पडसाद शनिवारी महापालिकेत झालेल्या पाणीपुरवठा नियोजन आढावा बैठकीत उमटले. पदाधिकारी, सदस्य यांनी पाणीपुरवठा नियोजनावरुन अधिकाऱयांना धारेवर धरले. शहरवासियांना फुकट पाणी देता का? असा प्रश्न उपस्थित करत पाणी देणार नसाल तर बील ही न भरण्याचा इशारा दिला.
पाणीपुरवठय़ाचा शहरात बोजबारा उडाला आहे. अनियमित पाणीपुरवठयामुळे नागरिकांच्या रोषाला नगरसेवकांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे पाण्याची सदस्या सोडविण्यासाठी महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात पदाधिकारी, अधिकारी, नगरसेवक यांची आढावा बैठक झाली.
बैठकीमध्ये बोलताना स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख म्हणाले, शहरातील काही प्रभागात आठवडाभर पाणी पुरवठा होत नाही. अधिकाऱयांचे याकडे पूर्णपणे दूर्लक्ष झाले आहे. नियमित पाणी पुरवठा होत नाही. मग नागरिकांनी नियमित बिले का भरायची. पाणी पुरवठा विभागातील कर्मचाऱयांकडून पाण्याची विक्री सुरु आहे. विक्री केलेला पाण्याचा टँकर सदस्यांच्या नावावर टाकला जात आहे. प्रभागातील नागरिकांची गैरसुविधा होवू नये या करीता सदस्यांनी टँकरची मागणी केल्यास त्याचे बील सदस्यांच्या नावावर टाकले जाते. निवडणुकी दरम्यान एन.ओ.सी देतेवेळी हे बील वसुल पेले जाते. ज्या कर्मचाऱयांनी पाणी टँकरची बिले वसुल केली आहेत, त्यांना स्थायी समिती सभेत रेकॉर्डसह हजर राहण्याची सूचना जलअभियंता यांनी केली.
नगरसेविका दिपा मगदूम म्हणाल्या, बालिंगा पाणी उपसा केंद्र वारंवार बंद पडत आहे. त्यामुळे या केंद्रावर अवलंबून असणाऱया प्रभागांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. अधिकारी फोन उचलत नाहीत आम्हाला नागरिकांच्या रोषास सामोरे जावे लागते. कर्मचारी कमी आहेत ही कारणे सदस्यांना सांगायची नाहीत. तो प्रशासनाचा प्रश्न आहे. सदस्यांनी कितीही सांगितले तर कर्मचारी एwकत नाहीत अशी तक्रार मांडली.
यावेळी आयुक्त डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी यांनी अधिकाऱयांनी त्यांची जबाबदारी गांभीर्याने पूर्ण करावी. प्रत्येक गोष्टीत आयुक्तांनी मार्गदर्शन करायचे मग अधिकारी काम करणार हे बरोबर नाही. अधिकाऱयांनी घटनास्थळी जावून नागरिकांचे प्रश्न समजावून घेवून ते तातडीने सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी सूचना केली.
बैठकीला उपमहापौर संजय मोहिते, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, परिवहन समिती सभापती अभिजीत चव्हाण, जलअभियंता भास्कर कुंभार, नगरसेवक राजाराम गायकवाड, सचिन पाटील, संदीप कवाळे, उपआयुक्त धनंजय आंधळे, सहा.आयुक्त संजय सरनाईक, शाखा अभियंता रामनाथ गायकवाड, राजेंद्र हुजरे, अक्षय आटकर, गुंजन भारंबे, अभिलाषा दळवी, राजेंद्र पाटील, मिलींद पाटील आदी उपस्थित होते.
टँकर दिला म्हणजे काम झाले काय?
प्रभागात अपुरा पाणी पुरवठा होतो, तेंव्हा नागरीक आम्हाला फोन करतात. याबाबत अधिकाऱयांना फोन केला तर अधिकारी फोन उचलत नाहीत. आंदोलन केल्यावर लगेच पाणी पुरवठा पूर्ण दाबाने होतो. पाणी पुरवठयासाठी नेहमी आंदोलनच करत बसायचे काय? शाहुपूरी येथे बांधण्यात आलेल्या टाकीकडे गेली पाच वर्ष आम्ही फक्त बघत बसायचे काय? पाण्याचा टँकर दिला म्हणजे काम झाले असे नाही. पाणी पुरवठा सुरळीत केव्हा होणार असा प्रश्न उपसिथत करत नगरसेविका गिता गुरव, पुजा नाईकनवरे, माधुरी लाड, प्रतिक्षा पाटील, प्रतिज्ञा उत्तूरे यांनी अधिकाऱयांना धारेवर धरले.
ठराव झाला असतानाही टँकरचे पैसे का घेता?
प्रभागात गेल्या तीन वर्षांपासून दिवसाआड पाणी पुरवठा सुरु आहे. पंपिग स्टेशन बंद पडले तर तीन दिवस पाणी पुरवठा होत नाही. नागरिकांसाठी टँकर मागविला तर त्याचे 10 हजार 500 रुपयांचे बील वसुल करण्यात आले. पाणी माझ्यासाठी मागतिले होते काय? असा प्रश्न उपस्थित करत टँकरचे पैसे घ्यायचे नाहीत असा ठराव झाला असतानाही पैसे का घेता अशी विचारणा ताराराणी आघाडीचे गटनेते सत्यजित कदम यांनी केली.
पाणी पुरवठा नियमित होतो सांगा, राजीनामा देतो
नियमित पाणीपुरवठा होण्यासाठी काय नियोजन केले हे अधिकाऱयांनी सांगावे. शहरात होणाऱया अपुऱया पाणीपुरवठयाकडे अधिकाऱयांनी साफ दूर्लक्ष केले आहे. शहरात नियमित पाणीपुरवठा सुरु असल्याचे अधिकाऱयांनी सांगावे, आपण तत्काळ पदाचा राजीनामा देतो, असे सभापती शारंगधर देशमुख यांनी सांगितले.