दोन दिवसांत आगीच्या 9 घटना : दक्षिणमधून उत्तर भागात जाण्यास लागतोय वेळ
उदासीनता…
- शहराच्या उत्तर भागामध्ये अग्निशमन केंद्र सुरू करण्यात प्रशासनाची उदासीनता
- शॉर्टसर्किट, गॅसगळती यासारख्या प्रकारांमुळे वारंवार आगीच्या घटनांमध्ये वाढ
- महानगरपालिकेने जागा उपलब्ध केल्यास अग्निशमन केंद्र उभारले जाणार
प्रतिनिधी /बेळगाव
मागील अनेक वर्षांपासून मागणी करूनही अद्याप शहराच्या उत्तर भागामध्ये अग्निशमन केंद्र सुरू करण्यात प्रशासनाची उदासीनता दिसून येत आहे. मागील दोन दिवसांमध्ये शहर व तालुक्मयात आग लागण्याच्या तब्बल 9 घटना घडल्या. यातील सहा घटना उत्तर भागात घडल्यामुळे शहराच्या दक्षिण भागातून घटनास्थळी पोहोचेपर्यंत मालमत्तेचे नुकसान होत आहे. त्यामुळे शहराच्या उत्तर भागात मनपाने जागा मंजूर करून त्याठिकाणी अग्निशमन केंद्र सुरू करावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
बेळगाव शहराचा विस्तार दिवसेंदिवस वाढत आहे. त्याचप्रमाणात आग लागण्याच्या घटनांमध्येही वाढ होत आहे. शॉर्टसर्किट, गॅसगळती यासारखे प्रकार वारंवार होत असल्यामुळे आगीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. शुक्रवारी प्रूट मार्केट येथे एका गादी दुकानाला भीषण आग लागली. यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले. त्याचबरोबर कंग्राळी येथे गोठय़ाला, भुतरामहट्टी येथे गवतगंजीला, श्रीनगर येथे इमारतीत लागलेली आग व शनिवारी रात्री भेंडीबाजार येथे एका दुकानाला आग लागल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची घटना घडली. या घटना शहराच्या उत्तर भागात घडल्या आहेत.
घटनास्थळी पोहोचण्यास अनेक अडथळे
सध्या असणारे अग्निशमन केंद्र हे गोवावेस येथे आहे. तेथून शहराच्या उत्तर भागात पोहोचेपर्यंत पाच ते सहा सिग्नल लागतात. दुर्घटना घडल्यानंतर घटनास्थळी पोहोचेपर्यंत वाहतूक कोंडी व सिग्नलमुळे वेळ लागत आहे. त्यामुळे मालमत्तांचे नुकसान होण्याचे प्रमाण वाढले आहे. शुक्रवारी एकाचवेळी अनेक दुर्घटना घडल्यामुळे खानापूर तसेच एअरफोर्स येथील अग्निशमन बंब मागविण्यात आला होता. त्यामुळे शहराच्या उत्तर भागात एक अग्निशमन केंद्र उभारणे गरजेचे झाले आहे.
बेळगाव शहराच्या उत्तर भागात शहरासह तालुक्मयाचा भाग येतो. ऑटोनगर, होनगा, काकती, कंग्राळी हा औद्योगिक परिसर उत्तर भागात आहे. याचबरोबर अनेक प्रकल्प, सरकारी कार्यालये, नागरी वस्ती, बसस्थानक असल्यामुळे या परिसरात अग्निशमन केंद्र उभारणे जरुरीचे आहे. महानगरपालिकेने जागा उपलब्ध करून दिल्यास उत्तर भागात सुसज्ज असे अग्निशमन केंद्र उभारण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
उत्तर भागात अग्निशमन केंद्र उभारण्यासाठी प्रयत्न
बेळगाव शहराच्या उत्तर भागात अग्निशमन केंद्र झाल्यास त्याचा फायदा नागरिकांना होणार आहे. सध्या लोकसंख्या वाढत असून उपनगरांमध्ये वसाहती वाढत आहेत. त्यामुळे गोवावेस येथून उपनगरांपर्यंत पोहोचेतोवर बराचसा कालावधी लागत आहे. त्यामुळे शहराच्या उत्तर भागात अग्निशमन केंद्र उभारण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना सांगितले.
-व्ही. एस. टक्केकर (अग्निशमन अधिकारी)