दोन-तीन दिवसांपासून थंडीत वाढ : नागरिकांनी आरोग्याची काळजी घेणे गरजेचे
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव शहर व तालुका परिसरात वातावरणाच्या बदलामुळे नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. आता गेल्या चार दिवसांपासून बोचऱया थंडीला सुरुवात झाली आहे. मंगळवारी तर बेळगाव शहराचा पारा 16.2 अंशांवर घसरला आहे. आता थंडीला व सुगीलाही सुरुवात झाली आहे. भात कापणीबरोबरच मळणीची कामेही सुरू आहेत.
गेल्या चार दिवसांपूर्वी दुपारी ढगाळ वातावरण निर्माण होत होते. मात्र दोन ते तीन दिवसांपासून थंडीला सुरुवात झाली असून सध्या बेळगावचा पारा घटत आहे. यावषी अधिक प्रमाणात थंडी पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. सध्या बेळगावचे कमाल तापमान 28.7 वर असून किमान तापमान 16.2 वर घसरले आहे. सध्या कोरोनाचे प्रमाण नियंत्रणात असल्याने आरोग्य खात्यासह नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मात्र आता थंडीमुळे सर्वसामान्यांना आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे. महत्त्वाचे म्हणजे ग्रामीण भागात थंडीची तीव्रता अधिक जाणवत आहे.
थंडीमुळे मानवी आरोग्यावर काही प्रमाणात परिणाम होत आहे. सर्दी, ताप, खोकला आदी विकारांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. ग्रामीण भागात शेकोटय़ाही पेटू लागल्या आहेत. थंडीपासून बचाव करण्यासाठी अनेक जण गरम कपडे खरेदी करण्याकडेही वळले आहेत. त्याबरोबरच अनेक नागरिक डॉक्टरांचा सल्ला घेऊन आजार बळावणार नाहीत, याची काळजी घेत आहेत.