नागरिकांची खरेदीसाठी गर्दी, कोरोना नियमांचे उल्लंघन : लॉकडाऊनचा कालावधी शिथिल करण्यात आल्याने दिलासा
प्रतिनिधी /बेळगाव
एक दोन नव्हे तर तब्बल 52 दिवसांच्या प्रदीर्घ लॉकडाऊननंतर सोमवारपासून लॉकडाऊनचा कालावधी शिथिल करण्यात आला आणि शहराला जणू नवीन गती प्राप्त झाली. लॉकडाऊनचा कालावधी शिथिल करण्याचे वृत्त शनिवारीच प्रसिद्ध झाले. आणि नागरिक सोमवार कधी उजाडतो याचीच वाट बघू लागले. सोमवार उजाडला आणि अपेक्षेप्रमाणे शहरात सर्वत्र नागरिकांची खरेदीसाठी प्रचंड गर्दी झाली.
जणू 52 दिवसांच्या बंदीवासातून बाहेर पडल्याप्रमाणेच नागरिक उत्साहित झाले होते. आणि मीठापासून पिठापर्यंत, पीन टू पियानोपर्यंत इतके दिवस अडून राहिलेली खरेदी त्यांनी मनापासून केली. एकीकडे अन्नधान्य, भाजीपाला यांची खरेदी सुरू होती. तर दुसरीकडे विविध साहित्याच्या दुकानांमध्ये शेतीची अवजारे बी बियाणे, विविध प्रकारची खते, इलेक्ट्रॉनिक वस्तू, सोने, चांदी, वस्त्र प्रावरणे, मिठाईची दुकाने, शोरूम्स आणि मॉल, बेकरी, रंग, बांधकाम साहित्य, पादत्राणे यांची खरेदी सुरू होती. त्यामुळे बहुसंख्य दुकानात दुपारी 12 च्या आतच भरपूर गर्दी झाली. गॅरेज, सर्व्हिसिंग सेंटर्स येथेसुद्धा वाहनचालकांनी गर्दी केले.
प्रत्येकानेच केले संधीचे सोने
दोन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर बाजार पुन्हा भरल्याने प्रत्येक लहान मोठय़ा विपेत्याने या संधीचे सोने केले. अगदी रस्त्यावर फुल विक्री करणाऱया व्यक्तीपासून ते अगदी मोठय़ा दुकानांपर्यंत प्रत्येक व्यक्ती आपले साहित्य कसे विकले जाईल हे कटाक्षाने पहात होता.
रस्त्यांवर मास्कची विक्री, किरकोळ हार्डवेअरचे साहित्य, लोणचे, रांगोळी, पुजा साहित्य, फळे, भाज्या, कपडे, प्लास्टिकचे साहित्य, खेळणी यांची विक्री केली जात होती. लॉकडाऊनचा फटका लहान विपेत्यांनाही बसल्याने या मिळालेल्या संधीचे सोने नागरिकांनी करून घेतले.
शहराची मध्यवर्ती बाजारपेठ म्हणजेच कांदा मार्केट, झेंडा चौक, गणपत गल्ली, मारूती गल्ली, काकतीवेस हा परिसर गर्दीने फुलून गेला. तर शहराच्या अन्य ठिकाणी असणाऱया बाजारपेठेत म्हणजेच शहापूर, खडेबाजार, सराफगल्ली, अनगोळ, टिळकवाडी पहिले रेल्वे गेट, तिसरे रेल्वे गेट येथे आणि उपनगरांमध्ये गर्दी दिसून आली.
सामाजिक अंतराच्या नियमाचे उल्लंघन
दरम्यान सोमवारी योग दिन असल्याने सरकारच्या आवाहनानुसार बहुसंख्य योग संस्थांनी उद्यानांमध्ये आणि मैदानांमध्ये योगदिन साजरा केला. त्यामुळे त्यांचाही वावर वाढल्याने गर्दीत भर पडली. दरम्यान बससेवा सुरू झाल्याने जवळपासच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी प्रवाशांनी बसना गर्दी केली. तब्बल 52 दिवसांनी शहरामध्ये बसेस धावू लागल्या आहेत. मात्र सोमवारी झालेल्या गर्दीने सामाजिक अंतराच्या नियमाचे पार उल्लंघन झाले. नियम डावलणे परवडणारे नाही याचे भान बाळगणे आवश्यक आहे.
वटपौर्णिमेच्या साहित्याचीही खरेदी
महिलांचा सण म्हणून ओळख असणारी वटपौर्णिमा गुरुवारी आहे. परंतु पुन्हा लॉकडाऊन होईल या भीतीने सोमवारीच महिलांनी खरेदी केली. आंबा, फणस, केळी यासह इतर फळे व वटपौर्णिमेच्या पुजेसाठी लागणाऱया साहित्याची जागोजागी विक्री केली जात होती. हे साहित्य खरेदी करण्यासाठी महिलांचीही संख्या अधिक होती. गणपतगल्ली, मारूती गल्ली, किर्लोस्कर रोड, काकतीवेस या परिसरात वटपौर्णिमेच्या साहित्याची विक्री करणारे विपेते दिसून आले.
वाहनचालकांची वाहतूक कोंडीने दमछाक
तब्बल 52 दिवसांनी बेळगाव जिल्हय़ातील लॉकडाऊन हटविण्यात आले. यामुळे सोमवारी खरेदीसाठी बेळगाव शहरात तुफान गर्दी पहायला मिळाली. गर्दीतून वाट काढताना वाहनचालकांची मात्र पूरती दमछाक झाली. अनेकजण तासनतास वाहतूक कोंडीमुळे अडकून पडले. त्यामुळे वाहनांपेक्षा चालत गेलेलेच बरे असे म्हणण्याची वेळ सोमवारी बेळगावकरांवर आली.
कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाल्याने राज्य सरकारने बेळगावसह इतर जिल्हय़ांमध्ये अनलॉक करण्याचा निर्णय घेतला. अनलॉक झाल्याने सोमवारी सकाळपासून शहरात तुफान गर्दी पहायला मिळाली. सायंकाळी 5 वाजेपर्यंत दुकाने खुली ठेवली जाणार असली तरी सकाळपासूनच खरेदीसाठीची झुंबड शहर व उपनगरांमध्ये पहायला मिळत होती.
दक्षिण भागातून येणाऱया गोगटे सर्कलपासूनच वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. कॅम्प, धर्मवीर संभाजी चौक, किर्लोस्कर रोड, कॉलेज रोड, चन्नम्मा चौक, काकतीवेस रोड, समादेवी गल्ली, खडेबाजार, गणपत गल्ली, मारूती गल्ली, कलमठ रोड, रविवार पेठ, शनि मंदिर रोड, कपिलेश्वर उड्डाणपूल या सर्वच परिसरात वाहतूक कोंडीने वाहनचालक त्रस्त झाले. दुचाकी सोबतच चारचाकी वाहनेही तासनतास वाहतूक कोंडीमध्ये अडकून पडली. सोमवारी शहरात येणाऱया प्रत्येकालाच या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला.
बेळगाव शहरासोबतच उपनगरांमध्येही अशीच वाहतूक कोंडी दिवसभर दिसून आली. खडेबाजार, शहापूर, बाजारगल्ली वडगाव, खासबाग सर्कल, संभाजी चौक अनगोळ, आरपीडी चौक, टिळकवाडी, सदाशिवनगर, महांतेशनगर, नेहरूनगर, आझमनगर, गांधीनगर या परिसरात झालेल्या प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना वाहनचालकांना करावा लागला. त्यामुळे बाजारात येणे नको रे बाबा असे म्हणण्याची वेळ बेळगावकरांवर आली.