प्रतिनिधी / कोल्हापूर
शहराच्या ज्या ज्या भागात पंचगंगा नदीचे पाणीचे पाणी पसरते तेथील पूरबाधित नागरिकांचे वेळीच स्थलांतर करा, अशी सूचना आमदार चंद्रकांत जाधव यांनी सोमवारी महापालिकेच्या अधिकाऱयांबरोबर झालेल्या आढावा बैठकीत केली.
आयुक्त डॉ. कलशेट्टी यांच्यासह महापालिकेचे अधिकाऱयांची या बैठकीला उपस्थित होते. सासने मैदानाजवळील महापालिकेच्या निवडणूक कार्यालयात ही बैठक झाली. यावेळी उपायुक्त निखिल मोरे, उपशहर अभियंता रमेश मस्कर, रावसाहेब चव्हाण, बाबूराव दबडे, मुख्य अग्निशन अधिकारी रणजित चिले, आरोग्य निरीक्षक स्वप्नील उलपे, संदीप राजगोळकर आदी उपस्थित होते.
शहरात पंचगंगा नदीला पूर आल्यानंतर ज्या भागात पाणी येण्याची शक्यता आहे, अशा सर्व परिसराचा महापालिकेच्या पदाधिकाऱयांसोबत दौरा केला होता. त्यावेळी स्थानिक नागरिकांनी केलेल्या सूचनांचा आढावा या बैठकीत घेण्यात आला.
पाहणी दौऱयावेळी पूरग्रस्त क्षेत्रातील नागरिकांनी सांगितलेल्या अडचणी आणि सूचनांचा अभ्यास करून त्यावर तातडीने अंमलबजावणी करण्यात यावी. वेळेत मदत आणि स्थलांतर करावे, अशी सूचना आमदार जाधव यांनी केली. शहरात 2005, 2019 मध्ये पूर पातळी किती होती, त्यावेळी नागरिकांचे स्थलांतर कशा पद्धतीने केले होते, यामध्ये नेहमी पाणी किती येते, मच्छिंद्री झाली असता पाणी किती येते आणि महापुराने धोका पातळी ओलांडल्यानंतर पाणी किती येते, याचाही माहिती आमदार जाधव यांनी घेतली.
बालिंगा पंपिंग स्टेशन उंचावर घ्या
महापुराच्या स्थितीत शहराच्या चोहोबाजूने पाणी असते मात्र पिण्यास पाणी नाही, स्थिती असते. त्या स्थितीत बालिंगा येथील पंपिंग स्टेशन पुरात बुडाल्याने ऐन पावसाळ्यात शहराचा पाणीपुरवठा विस्कळित होतो. त्या दृष्टीने पाण्याचे पंप उचलून घेण्याची सूचनाही आमदार जाधव यांनी केली. नागरिकांच्या मालमत्तेचे नुकसान होऊ यासाठी त्यांना वेळीच पूर्व सूचना द्याव्यात, असेही त्यांनी सांगितले.
दोन्ही खणींत पाणी मिसळू नये
शहरातील टाकाळा खण व सरनाईक कॉलनी येथील कदम खणीमध्ये पावसाचे पाणी मिसळून तेथील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होतो, त्यासाठी दोन्ही खणींच्या ठिकाणी संरक्षक भिंत बांधून पाणी खणीत मिसळू नये, यासाठी नियोजन करण्याची सूचना आमदार जाधव यांनी केली.