निपाणी शहराची परिस्थिती : कचरागाडीच्या अभावामुळे सेवा रस्त्याशेजारी घाणीचे साम्राज्य : बेळगाव-कोल्हापूर सेवा मार्गावरील चित्र : नगर पालिकेने उपाय योजना राबविण्याची गरज
प्रतिनिधी /निपाणी
निपाणी शहराची ओळख कोकनचे प्रवेशद्वार म्हणून आहे. सदर संदेश देणाऱया कमानी शहराच्या दोन्ही दिशांना लावण्यात आल्या आहेत. कोल्हापूर व बेळगावहून निपाणी शहरात प्रवेश करणाऱया मार्गावर सदर कमानीच्या माध्यमातून कोकन भागाचे प्रवेशद्वार असणारे रस्ते आता कचऱयांच्या ढिगांनी भरत आहेत. मृतजनावरे आणि टाकाऊ पदार्थांच्या वाढत्या कचऱयामुळे दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण होत आहे. याकडे पालिका प्रशासन कधी लक्ष देणार? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
बेळगाव-निपाणी या मार्गावर लकडीपूल, उड्डाणपूल, मुरगूडरोड, आंदोलन नगर उड्डाणपूल मार्गावरील परिस्थिती आता बिकट बनत चालली आहे. मृत जनावरे टाकण्यासाठी लकडी पुलमार्गाचा वापर सर्रास केला जात आहे. मद्यपींना ओपनबारची मजा घेण्यासाठी सदर मार्ग आता सोईस्कर बनला आहे. रात्रीच्यावेळी या मार्गावर अनेक मद्यपींच्या माध्यमातून कचरा निर्माण होत आहे. मुरगूडरोड उड्डाणपुला नजीकच्या सेवा मार्गावरही अनेक नागरिक शौचास बसत आहेत. तसेच भाजीपाला व अन्य विक्रेत्यांकडून टाकाऊ पदार्थ तेथेच टाकले जात आहेत. त्यामुळे प्रचंड दुर्गंधीचा सामना करत नागरिकांना मार्गक्रमण करावे लागत आहे.
आंदोलननगर परिसरातील नागरिकांसाठी घंटागाडीची सोय करण्यात आली आहे. तरीही बेजबाबदार नागरिकांकडून सेवा मार्गावरही कचऱयाचा मोठा ढिग रचण्यात येत आहे. पालिका स्वच्छताकर्मचारी तेथील कचरा सातत्याने घेऊन जातात. मात्र नागरिकांच्या चुकीच्या वर्तवणुकीमुळे शहरात ठिकठिकाणी कचराच कचरा निर्माण होत आहे. शहरातील ग्रीनपार्कमधील ओढामार्गावरही कचराच कचरा निर्माण होत आहे.
कचऱयामधील टाकाऊ अन्न पदार्थ खाण्यासाठी तोंड घालणाऱया भटक्या जनावरांमुळे कचरा मार्गावर विखरला जात आहे. त्यामुळे सकाळी व सायंकाळी फिरावयास जाणाऱया नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. याविषयी नागरिकांतून जागृती करण्यात येत आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने बेजबाबदारपणे कचरा टाकणाऱया नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे.
नियमीत कचऱयाचा उठाव
शहरातील 31 वार्डासाठी कचरा संकलन करण्यासाठी घंटागाडय़ांचे नियोजन करण्यात आले आहे. घराघरात साठवला जाणारा कचरा गोळा केला जात आहे. सदर कचरा गोळा करण्याचे काम नियमीतपणे सुरु आहे. नागरिकांचा या उपक्रमालाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. असे असतानाही काही बेजबाबदार नागरिकांच्या वागणुकीचा नियम पाळणाऱया नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.