प्रतिनिधी/ बेळगाव
शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये कोरोनाचा पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्यानंतर नागरिक धास्तावले आहेत. कोरोनाविषयक दक्षतांसाठी पुन्हा एकदा कठोर निर्बंध पालनाची गरज निर्माण झाली असून शहरातील व्यवसाय ठप्प झाले आहेत. शहराचा मध्यवर्ती भाग निर्बंधित क्षेत्र म्हणून घोषित झाल्यामुळे सर्वत्र बंद असल्याचे दृश्य पाहावयास मिळत आहे.
शहर आणि परिसरात वाहतूकविषयक नियम कठोर करण्यात आले आहेत. दि. 3 मेपर्यंत लॉकडाऊन कठोर राहणार असल्याची घोषणा झाली आहे. मात्र बुधवारी सायंकाळी निर्बंध शिथिल करण्यासंदर्भात घोषणा झाल्यामुळे शहरवासियांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. मात्र शहरातील परिस्थिती पाहता व्यवसाय पुन्हा कधी सुरू होणार, याविषयी साशंकतेचे वातावरण आहे. राष्ट्रीय आपत्ती निवारणासाठी लॉकडाऊनचे पालन आवश्यक आहे. मात्र दैनंदिन व्यवहार थांबून राहिल्यामुळे संभ्रमावस्था वाढली आहे.
शहरातील मध्यवर्ती भागात येणाऱया अनेक रस्त्यांवर पोलिसांकरवी नाकाबंदी करण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन होऊ नये यासाठी दक्षता घेण्यात येत आहे. अकारण फिरणाऱया नागरिकांची चौकशी करून त्यांना माघारी धाडण्यासाठी पोलीस यंत्रणा कार्यरत आहे. मात्र, एकंदरीत शहराच्या सभोवती पडलेला बॅरिकेड्सचा विळखा अधिकच घट्ट झाल्याचे चित्र दिसून येत आहे.