प्रमुख रस्त्यांचे काँक्रिटीकरण, इतर रस्त्यांच्या विकासाकडे कानाडोळा : कोटय़वधीचा निधी मंजूर होऊनही विकासकडे दुर्लक्ष
प्रतिनिधी /बेळगाव
शहरातील प्रमुख रस्त्यांचे काँक्रिटीकरण करून स्मार्ट सिटी बनविण्याचा आटापीटा प्रशासनाने चालविला आहे. पण प्रत्यक्षात शहराच्या अंतर्गत भागातील बहुतांश रस्त्यांची वाताहत झाली असून, वाहनधारकांना वाहने चालविणे कठिण बनले आहे. केवळ मुख्य रस्त्यांचा विकास केल्यानंतर स्मार्ट सिटी बनते का? असा मुद्दा उपस्थित करण्यात येत असून, अंतर्गत रस्त्यांचा विकास करण्यात यावा, अशी मागणी होत आहे.
रहदारी असलेल्या प्रमुख रस्त्यांचे काँक्रिटीकरण स्मार्ट सिटी योजनेंतगंत करण्यात आले आहे. मात्र बहुतांश रस्त्यांची दुरवस्था झाली असून, हीच का स्मार्ट सिटी? असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे. बाजारपेठ आणि विविध गल्ल्यांतील रस्त्यांवर खड्डय़ांचे साम्राज्य निर्माण झाले असून, एकही रस्ता सुस्थितीत नाही. प्रत्येक रस्त्यावर चरी निर्माण झाल्या आहेत. खडय़ांमुळे वाहनधारकांना वाहन चालविताना कसरत करावी लागते. काही ठिकाणी खड्डे चुकविले जाऊन अपघात घडत आहेत. प्रमुख रस्त्यांसह बाजारपेठेतील रस्त्यांवर देखील रहदारी वाढली आहे. त्यामुळे प्रत्येक रस्त्यावर वाहनांची घरघर सुरूच असते. पण रस्त्याच्या विकासाच्या दृष्टीने महापालिकेकडून कोणतीच कारवाई केली जात
नाही.
स्मार्ट सिटी बनविण्यासाठी प्रमुख रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाकरिता 1 हजार कोटीचा निधी खर्ची घालण्यात आला आहे. पण बाजारपेठेतील सर्रास रस्ते खड्डेमय बनले आहेत. केवळ प्रमुख मार्गावरूनच वाहनधारक व्यवस्थित वाहने चालवू शकतात. मात्र शहरातील अंतर्गत रस्त्यावरून वाहने चालविणे अशक्मय बनले आहे.
तक्रारींकडे दुर्लक्ष
शहरातील रस्त्यांची दुरूस्ती करण्यासाठी मनपाकडे अनेकवेळा तक्रारी करण्यात आल्या. मात्र निधी नसल्याचे सांगून विकास करण्याकडे आणि दुरुस्तीकडे कानाडोळा केला आहे. 1 हजार कोटीमधून कोणता विकास साधला? असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे. अंतर्गत रस्ते खराब झाल्याने वाहनधारकांची वाहने नादुरूस्त होत आहेत. पण नागरिकांचे आरोग्य देखील हानिकारक बनले आहे. खड्डेमय रस्त्यावरून दुचाकी वाहने चालविताना नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे अंतर्गत रस्त्यांचा विकास करण्यात यावा, अशी मागणी होत आहे. पाटील गल्ली, ताशिलदार गल्ली, गोंधळी गल्ली, केळकर बाग, दत्त मंदिर परिसर, बसवाण गल्ली तसेच खडक गल्ली, शेट्टी गल्ली, काकतीवेस रोड, गणपत गल्ली अशा अनेक गल्लीतील रस्त्यांची वाताहत झाली आहे. त्यामुळे सर्व रस्त्यांची पाहणी करून महापालिका आयुक्तांनी आवश्यक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.