दुरुस्तीकडे कंत्राटदार-अधिकाऱयांच्या दुर्लक्षामुळे समस्या
प्रतिनिधी /बेळगाव
शहरातील विविध रस्त्यांची दुरवस्था झाली असून काही ठिकाणी विकासाचा सपाटा सुरू आहे. याकरिता विविध रस्त्यांवर खोदाई करण्यात आली आहे. त्यामुळे वाहनचालकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. मात्र अशातच ठिकठिकाणी असलेले पथदीप आणि हायमास्ट बंद पडल्याने वाहनचालकांच्या समस्येत भर पडली आहे.
पथदिपांची देखभाल व्यवस्थित केली जात नसल्याने शहर व उपनगरांतील निम्मे पथदीप बंद आहेत. हायमास्टच्या दुरुस्तीच्या कामाकडे कानाडोळा केल्याने निम्मे हायमास्ट केवळ शोभेचे बनले आहेत. काही ठिकाणी असलेले पथदीप सुरू असतानादेखील कंत्राटदाराकडून बंद ठेवले जात आहेत. त्यामुळे अंधाराचा सामना करावा लागत आहे. शहर स्मार्ट बनविण्यासाठी कोटय़वधीचा चुराडा केला जात आहे. पण नागरिकांसाठी आवश्यक असलेल्या सुविधा पुरविण्याकडे जिल्हा प्रशासन आणि महापालिकेचे दुर्लक्ष झाले आहे. पथदीप देखभालीच्या नावाखाली वर्षाला 4 कोटीहून अधिक निधी खर्च केला जातो. पण खर्च केलेल्या निधीच्या तुलनेत पथदिपांची देखभाल केली जात नसल्याचे निदर्शनास आले आहे. शहर आणि उपनगरांतील निम्मे पथदीप सध्या बंदच आहेत.
विशेषतः डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, क्लब रोड, कॉलेज रोड, महाद्वार रोड, एसपीएम रोड, महात्मा फुले रोड, गोवावेस सर्कल ते नाथ पै चौक, विजयनगर, सहय़ाद्रीनगर रोड अशा विविध भागातील पथदीप बंद आहेत. तसेच गोवावेस सर्कल, मिलिटरी विनायक मंदिरामागील विजयनगर, हनुमाननगर चौक, खंजर गल्ली, टिळक चौक अशा विविध भागातील हायमास्ट बंद ठेवण्यात आले आहेत. शहरातील हायमास्ट दुरुस्त करण्यासाठी एस्टिमेट तयार करण्यात आले आहे. पण महापालिकेकडे निधी नसल्याने हायमास्टच्या दुरुस्तीकडे कानाडोळा करण्यात आला आहे.
सध्या शहरात विविध रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात येत असल्याने रस्त्यांची खोदाई करण्यात आली आहे. काही ठिकाणी चरी खोदण्यात आल्या आहेत व साहित्य विखुरले आहे. यामुळे याचा अडथळा वाहनधारकांना पार करावा लागतो. तसेच काही रस्त्यांवर लोखंडी सळय़ा उघडय़ावर असल्याने वाहनधारकांना धोका निर्माण झाला आहे. पण पथदीप व हायमास्ट बंद असल्याने रस्त्यावरील अडथळे वाहनधारकांना दिसून येत नाहीत. त्यामुळे अपघाताला सामोरे जावे लागत आहे.
कंत्राटदारावर कारवाई करा
शहरातील पथदीप दुरुस्त करण्यात यावेत, अशी मागणी महापालिकेकडे वारंवार करूनही कानाडोळा केला जात आहे. त्यामुळे दुर्लक्ष करणाऱया मनपाच्या अधिकाऱयांसह संबंधित कंत्राटदारावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.