मालवण उपनगराध्यक्ष राजन वराडकर यांचा आरोप
पॉझिटिव्ह रुग्णांच्या घरातील माणसे बाहेर फिरताहेत!
नागरिकांचे आरोग्य धोक्यात असताना गांभिर्याने कधी घेणार?
स्वच्छता विभागातील कर्मचाऱयांच्या जीविताशी खेळण्याचा प्रकार!
प्रतिनिधी / मालवण:
मालवण शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्यासाठी नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी हेच जबाबदार आहेत. गेल्या दिड वर्षात शहरातील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी नगरसेवकांची एकही बैठक प्रशासनाने अगर मुख्याधिकाऱयांनी आयोजित केलेली नाही. शहरात रुग्ण सापडलेल्या घरातील माणसे बिनधास्तपणे फिरत असताना पालिका प्रशासनाने कोणतीही कारवाई केलेली नाही. पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्यानंतर फलकही लावण्यात पालिका प्रशासन कुचकामी ठरले आहे. शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात असताना अद्यापही पालिका प्रशासन आणि नगराध्यक्ष गांभिर्याने घेत नसल्याचा आरोप उपनगराध्यक्ष राजन वराडकर यांनी पत्रकार परिषदेत केला.
उपनगराध्यक्ष कक्षात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी नगरसेवक गणेश कुशे उपस्थित होते.
कर्मचारीही माणूसच आहेत!
शहरातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या अंत्यसंस्कारासाठी नियुक्त पथकातील चार कर्मचाऱयांसह त्यांच्या कुटुंबातीलही काही सदस्य पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांच्या जीविताशी खेळण्याचा प्रकार पालिका प्रशासनाने केला आहे. स्थायी समिती बैठकीत याबाबत आपण अंत्यसंस्कारासाठी ठेकेदार नियुक्त करून पालिकेने आर्थिक खर्च उठवावा, अशी सूचना केली होती. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केल्याने आता स्वच्छता विभागातील कर्मचारी अंत्यसंस्कारासाठी वापरून त्यांच्या जीविताशी खेळण्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे शहरात कचऱयाचीही समस्या निर्माण झाली आहे. पालिकेचे कर्मचारी सध्या दिवसभर काम करताहेत. कर्मचारीही माणूसच आहेत, त्यांच्यावर किती दबाव टाकायचा हेही महत्वाचे आहे. रात्री-अपरात्री त्यांना अंत्यसंस्कारासाठी बोलवायचे आणि दिवसभर स्वच्छतेची कामे करून घ्यायची हे योग्य नाही. ठेकेदारी पद्धतीने हा ठेका ओरोस येथे देण्यात आला असता, तर चारही कर्मचारी आज पालिकेत कार्यरत राहिले असते, असाही टोला वराडकर यांनी लगावला.
पॉझिटिव्ह रुग्णांचे कुटुंब फिरतेय!
शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडलेल्या व्यक्तींची कुटुंबे बाजारात बिनधास्तपणे फिरताना दिसत आहेत. काही ठिकाणी तर कोरोना पॉझिटिव्ह रुग्णही फिरताना दिसताहेत. यावर पालिकेचे कोणतेही नियोजन नसल्याने आज शहरात भीतीदायक परिस्थिती निर्माण झाली आहे. पालिकेतर्फे साधा फलकही रुग्णाच्या घरी लावला जात नाही. त्यामुळे अशा परिस्थितीला आता पालिका प्रशासन कसे सामोरे जाणार, की शहरवासियांना वाऱयावर सोडून मुख्याधिकारी सिंधुदुर्गनगरी येथे राहणार हे येणारा काळच ठरवेल. मुख्याधिकारी हे मुख्यालयी मालवणात राहणे आवश्यक असताना ते ओरोस येथे राहत आहेत. त्यामुळे शहरात आपत्कालीन परिस्थितीत शहरवासियांना प्रचंड हाल सहन करावे लागले आहेत. मुख्याधिकाऱयांनी योग्यप्रकारचे नियोजन न केल्यानेच तब्बल आठ दिवस शहर अंधारात राहिल्याचा आरोपही वराडकर यांनी केला.
नगराध्यक्षांवरही उपनगराध्यक्षांचे आरोप
नगराध्यक्ष म्हणजे ‘येडा बनके पेढा खानेका’ अशी स्थिती आहे. ऑनफिल्ड म्हणून सांगत सुटलेल्या नगराध्यक्षांकडून शहरातील तुटलेली झाडेही अद्याप उचलली जात नसल्याने त्यांनी कोणतीही कार्यवाही केल्याचे दिसत नाही. शहरातील वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी नागरिकांनी आपापल्या भागात अंगमेहनत केली. पालिकेचे कोणतेही पथक मदतीला गेले नाही. शहरातील इतर नागरिक अंधारात असताना नगराध्यक्ष मात्र जनरेटरवर हवा खात होते. नागरिकांनी पदरमोड करून झाडे तोडून वीजपुरवठा सुरळीत केला. त्यामुळे पालिकेची लाज राखली गेली, असेही वराडकर म्हणतात.
लसीकरणातही राजकारण!
लसीकरणासाठी सकाळपासून रांगेत राहिलेल्या व्यक्तींना बाजूला करून पाठिमागून आत घेतलेल्या व्यक्तींना पहिल्यांदा लसीकरण केले जात असल्याचा आरोप गणेश कुशे यांनी केला. यासाठी दोन वेगवेगळय़ा याद्या बनविण्यात आल्या असून एक यादी मंदार केणी यांची असून लसीकरणस्थळी त्यांची यादी वापरली जात असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे शहरातील नागरिकांना वेठीस धरून ठरावीक नगरसेवकांच्या लोकांना प्राधान्य दिले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.