प्रतिनिधी / बेळगाव
पाणी अमृत आहे, त्याचा वापर जपून करा, असा पाणी बचतीचा मंत्र ग्राहकांना पाणीपुरवठा मंडळाकडून दिला जातो. पण याची अंमलबजावणी करण्यास पाणीपुरवठा मंडळानेच दुर्लक्ष केले आहे. यामुळे शहरात विविध ठिकाणी असलेल्या व्हॉल्वमधून दररोज शेकडो लीटर पाणी वाया जात आहे. याबाबत उपाययोजना करण्याकडे अधिकाऱयांचे दुर्लक्ष झाले आहे.
शहरात विविध ठिकाणी व्हॉल्वमधून सातत्याने पाणी वाहते. वडगाव आदर्श विद्यामंदिर शाळेशेजारील व्हॉल्वमधून सतत पाणी वाहत आहे. याची दुरुस्ती करण्याकडे पाणीपुरवठा मंडळाचे दुर्लक्ष झाले आहे. याबाबत पाणीपुरवठा मंडळाच्या अधिकाऱयांकडे तक्रार करूनही दखल घेतली जात नाही. यामुळे पाणी बचतीचा मंत्र केवळ नागरिकांनाच लागू आहे का? असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे.
गणपत गल्ली कॉर्नर, विनायकनगर बसथांबा तसेच विविध गल्ल्यांच्या कोपऱयांवर अशा प्रकारचे व्हॉल्व बसविले आहेत. या व्हॉल्वद्वारे पाणी वाहत असल्याने आवश्यक उपाययोजना राबविण्याची गरज आहे. राकसकोप जलाशय व हिडकल डॅममधून शहरात पाणी आणण्यासाठी प्रत्येक महिन्याला कोटीच्या घरात विद्युत बिल भरले जाते. त्याचप्रमाणे जलशुद्धीकरण करण्यासाठी प्रत्येक महिन्याला लाखोचा निधी खर्च केला जातो. हा खर्च जनतेकडून वसूल केला जातो. मात्र, शुद्ध केलेले पाणी गळतीद्वारे व व्हॉल्वच्या माध्यमातून वाया जात आहे. त्यामुळे गळत्यांचे निवारण करण्यात यावे, अशी मागणी होत आहे.