सातत्याने स्वच्छतेची मागणी करूनही महापालिकेचे दुर्लक्ष
प्रतिनिधी /बेळगाव
शहरातील बहुतांश सर्व्हिस रोडवरील (भंगीबोळातील) अतिक्रमण हटविण्याची कारवाई महापालिकेच्यावतीने राबविण्यात आली होती. काही ठिकाणी पेव्हरब्लॉक घालून रस्ते करण्यात आले. मात्र सर्व्हिस रस्त्याची स्थिती आता पुन्हा जैसे थे झाली असून काही ठिकाणी कचऱयाचे ढिगारे साचले आहेत. त्यामुळे सर्व्हिस रस्त्याच्या स्वच्छतेची मागणी सातत्याने करण्यात येत आहे. पण याकडे महापालिकेच्या स्वच्छता विभागाने पाठ फिरविली असल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
बहुतांश ठिकाणी अतिक्रमण झाले असल्याचे निदर्शनास आले आहे. या अतिक्रमणाबाबतची माहिती महापालिकेच्या अधिकाऱयांना असूनदेखील अतिक्रमणे हटविण्यात महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम खात्याने साफ दुर्लक्ष केले आहे. महापालिका व्याप्तीमध्ये असलेल्या मुख्य रस्त्यावर तसेच खुल्या जागावर अतिक्रमण करून बांधकाम करण्यात आले असल्याबाबतच्या तक्रारी महापालिकेकडे होत असतात. अतिक्रमण हटविण्यासाठी विविध उपक्रम महापालिकेच्यावतीने हाती घेण्यात येते. तरीदेखील महापालिका प्रशासनाला अतिक्रमणे रोखण्यात यश आले नाही. मात्र अतिक्रमणे कमी होण्याऐवजी वाढत चालली आहेत. अतिक्रमणामुळे शहरातील सर्व्हिस रस्त्यांचे अस्तित्व संपुष्टात आले आहे. विशेषतः टिळकवाडी, शहापूर, शिवाजी नगर, बाजारपेठ परिसरातील सर्व्हिस रस्त्यावर अतिक्रमण झाले असल्याच्या तक्रारी होत
आहेत.
टिळकवाडी परिसरातील सर्व्हिस रस्त्यावर कचऱयाचे ढिगारे साचले आहेत. जुन्या इमारतीची माती, बांधकाम साहित्य टाकण्यात येत असल्याने सर्व्हिस रस्ते बंद झाले आहेत. बहुतांश ठिकाणी कचरा टाकण्यात येत असल्याने दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. सर्व्हिस रस्त्याशेजारील गटारी स्वच्छ केल्या जात नसल्याने दुर्गंधीच्या समस्येत आणखीणच भर पडली
आहे.
टिळकवाडी, भाग्यनगर अनगोळ, आगरकर रोड येथील सर्व्हिस रोडवर पेव्हर्स ब्लॉक घालून रस्ता करण्यात आला होता. पण बहुमजली इमारतीच्या बांधकामासाठी बांधकाम साहित्य टाकण्यात आल्याने पेव्हर्सब्लॉकचे नुकसान झाले आहे. रस्त्याची दुरवस्था झाली असून याठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले आहे.
सर्व्हिस रोडवर कचरा टाकण्याचे प्रकार सुरू असल्याने भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला आहे. प्रत्येक भंगीबोळात भटक्मया कुत्र्यांचा कळप वास्तव्यास असल्याने याचा नाहक त्रास नागरिकांना सोसावा लागत आहे. तसेच डासांचा उपद्रव वाढला असून रोगराई पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. सर्व्हिस रस्त्याची स्वच्छता केली जात नसल्याने झाडे-झुडपे आणि रान उगवले आहे. परिणामी सापाकिडय़ांचे वास्तव्य वाढले आहे.
सर्व्हिसरोडवरील कचरा व दुर्गंधीबाबत महापालिकडे वारंवार तक्रारी करण्यात आल्या आहेत. याबाबत महापालिकेच्या अधिकाऱयांना माहिती असूनही याकडे पाठ फिरविली असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. यामुळे महापालिका आयुक्तांनी सर्व्हिस रस्त्यांची पाहणी करून याबाबत आवश्यक उपाययोजना हाती घ्याव्यात, अशी मागणी होत आहे.