कोरोना संकटामुळे टाळेबंदी लागू करण्यात आली असून याचा प्रतिकूल प्रभाव डोमेस्टिक रेमिटेंसवर (शहरातून गावांमध्ये पाठविली जाणारी रक्कम) पडला आहे. मोठय़ा आणि मध्यम आकाराच्या शहरांमध्ये रोजगारासाठी लोक येत असतात. हे लोक कुटुंबासाठी पैसे पाठवत असतात, यालाच डोमेस्टिक रेमिटेन्स म्हटले जाते. डोमेस्टिक रेमिटेन्सचा मोठा हिस्सा असंघटित क्षेत्रातून येतो.
व्यवसाय बंद असल्याने कामगार घरी परतले आहेत. टाळेबंदीत हे कामगार पायीच रवाना झाल्याचे भयानक चित्र काही दिवसांपूर्वी देशवासीयांनी पाहिले आहे.
2 लाख कोटींचा आकडा
पेमेंट्स बँक, इको इंडिया फायनान्शियल सर्व्हिस, स्पाइस डिजिटलनुसार भारतातील डोमेस्टिक रेमिटेन्सची उलाढाल वर्षाकाठी 2 लाख कोटी रुपयांची आहे. कोरोना संकटापूर्वी महिन्याला 5 हजार कोटी रुपयांची रक्कम पाठविली जात होती. परंतु आता यात 80 टक्क्यांची घट झाली आहे. सद्यस्थिती सुधारण्यास किमान 6 महिन्यांचा कालावधी लागेल. सरकारने पीएम गरीब कल्याण योजनेस प्रारंभ केला आहे. याच्या अंतर्गत सर्वांच्या बँक खात्यात 3 महिन्यांमध्ये 1500 रुपये जमा केले जाणार आहेत.