मुबलक पाणी मिळत नसल्याच्या तक्रारी : नियोजन कोलमडले
प्रतिनिधी /बेळगाव
हिडकल जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी गेल्या चार दिवसांपासून शहरात पाणीपुरवठा नियोजन बारगळले आहे. मुबलक पाणी नसल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. काही भागात आठ दिवसांपासून पाणीपुरवठा करण्यात आला नाही. परिणामी पाणीटंचाईची समस्या भेडसावत असून, टँकरने पाणी विकत घेण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
हेस्कॉमची दुरुस्ती आणि जलवाहिनीची दुरुस्ती याकरिता शहरातील पाणीपुरवठा सातत्याने ठप्प होण्याचा प्रकार वाढला आहे. दर 15 दिवसांला एकदा दुरुस्तीच्या कारणास्तव चार ते पाच दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येत असल्याने पाणीटंचाईची समस्या निर्माण होत आहे. ठिकठिकाणी जलवाहिन्यांच्या गळतीद्वारे पाणी वाया जात असल्याने नागरिकांना मुबलक पाणी मिळत नाही. पाच दिवसांआड पाणीपुरवठा केला जातो, असे सांगण्यात येते. पण प्रत्यक्षात सात ते आठ दिवस पाणीपुरवठा केला जात नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. शहरवासियांना उन्हाच्या चटक्मयाबरोबर पाणीटंचाईची झळ सोसावी लागत आहे.
हिडकलचा पाणीपुरवठा चार दिवसांपासून बंद
हिडकल जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या नावावर शहराचा पाणीपुरवठा गेल्या चार दिवसांपासून बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. तसेच राकसकोप येथील जलाशयातील पाणीपुरवठा संपूर्ण शहराला करण्यात येत असल्याने मुबलक पाणी मिळत नाही. काही भागात दहा दिवसांनंतर पाणीपुरवठा करण्यात आला असून, केवळ 1 तास पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे इतक्मया कमी वेळात पाणी किती मिळणार, असा मुद्दा उपस्थित झाला आहे.
पाणीपुरवठा कधी सुरळीत होणार?
शहराच्या सर्वच भागात पाण्याची टंचाई भेडसावत असून पाणीपुरवठा कधी सुरळीत होणार, अशी विचारणा नागरिक करीत आहेत. एरवी एप्रिल-मे महिन्यात पाण्याचा तुटवडा भासतो. पण सध्या दररोज पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. पाणीपुरवठा नियोजन करण्यात एलऍण्डटी कंपनी अपयशी ठरल्याचा आरोप नागरिक करीत आहेत.