गळती काढण्यासाठी प्रयत्नांची गरज, दुरुस्तीच्या कारणास्तव शहापूर योजनेचा पाणीपुरवठा बुधवारी बंद
वार्ताहर / शाहूपुरी
शहापूर योजनेच्या वीज यंत्रणेचे मेन्टेन्ससचे काम सुरू असल्याने विद्युत पुरवठा खंडीत होणार आहे. त्याचा परिणाम म्हणून शहापूर केटी वेअर उपसा केंद्र बंद राहणार आहे. त्यामुळे शहापूर माध्यमातील गणेश टाकी, राजवाडा टाकी, गुरुवार टाकी, बुधवार नाका टाकी, घोरपडे टाकी व यशवंत गार्डन टाकी या टाक्यावर अवलंबून असणाऱया सर्व शहापूर माध्यमातून होणारा पाणीपुरवठा नागरिकांना होऊ शकणार नाही. त्यामुळे शहरातील शहापूर माध्यमातून पाणीपुरवठा होणाऱया नागरिकांना बुधवार दि. 14 रोजी पाणी पुरवठा होऊ शकणार नाही. दरम्यान, शहरात पाणी पुरवठा कपातीचे संकट असताना चार भिंती परिसरात वॉलला गळती लागल्यामुळे हजारो लिटर पाणी वाया जात आहे. त्यामुळे शहरात ठिकठिकाणी होणारी पाणी गळती थांबवा मग पाणी कपात करा, अशी मागणी सातारकर करत आहेत.
शहरातील शहापूर माध्यमातील रविवार पेठ, बुधवार पेठ, शनिवार पेठ, सोमवार पेठ, मंगळवार पेठमधील काही भाग, यादोगोपाळ पेठ, केसरकर पेठ, दुर्गा पेठ, गुरुवार पेठ, कुंभारवाडा, राजवाडा परिसर, चार भिती ते कूपर कारखाना डोंगरावरील भाग, फुटका तलाव परिसर, कमानी हौद परिसर, वाघाची नळी परिसर, पंचपाळी हौद परिसर, महात चौक परिसर, शुक्रवार पेठ काही भाग, सदाशिव पेठ, बुधवार पेठ काही भाग, भवानी पेठ या परिसरात सकाळ सत्रातील व दुपार सत्रातील पाणी पुरवठा होऊ शकणार नाही. तसेच घोरपडे टाकी व यशवंत गार्डन टाकी या माध्यमातून दुपार सत्रातील पाणीपुरवठा होणार नाही. तरी शहापूर माध्यमातून पाणीपुरवठा होणाऱया सर्व नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करुन नगरपरिषदेस सहकार्य करावे, असे आवाहन नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अभिजीत बापट, पाणीपुरवठा सभापती यशोधन नारकर, उपनगराध्यक्ष किशोर शिंदे व नगराध्यक्षा माधवी कदम यांनी केले आहे.
चारभिंती मार्गावरील टाकीच्या वॉलला लागली गळती
चारभिंतीकडे जाणाऱया मार्गावरील पाण्याच्या टाकी शेजारी असणाऱया वॉलमधील क्रॅक तुटल्यामुळे सोमवारपासून लाखो लिटर पाणी वाया जात होते. नवीन वॉल टाकल्याशिवाय पाणी बंद होणार नाही, असे तेथील कर्मचाऱयांकडून सांगण्यात येत आहे. शहरातील पाण्याच्या टाक्या आणि टाकी शेजारी असणाऱया वॉलला गळती लागून पाणी वाया जाण्याचे प्रकार वारंवार शहरात घडत असतात. पालिका कर्मचाऱयांची लवकर दुरूस्ती करत नसल्याने दररोज हजारो लिटर पाणी वाया जात असते. असाच प्रकार चारभिंतीकडे जाणाऱया मार्गावर दिसत आहे. या मार्गावर असणाऱया पाण्याच्या टाकी शेजारी असणाऱया वॉलमधील क्रॅक तुटला आहे. यामुळे पाण्याचा जोर वाढल्याने हजारो लिटर पाणी वाया जात आहे. हे पाणी संपूर्ण शाहूनगरमधील परिसरात पसरत आहे. आसपासच्या घरात हे पाणी जात असून यांची तक्रार येथील नागरिकांनी पालिकेच्या पाणी पुरवठा विभागात केली आहे. मात्र यांची दुरूस्ती झालेली नाही.