रस्त्यावरील पथदीप दिवसाही सुरूच : आदर्शनगर येथील नागरिकांमधून तीव्र संताप
प्रतिनिधी / बेळगाव
एकीकडे विजेचा अपव्यय टाळा असा संदेश देण्यात येतो, तर दुसरीकडे रस्त्यावरील पथदीप दिवसाढवळय़ा सुरू असल्याचे पाहायला मिळते. पथदिपांचे कामकाज पाहण्यासाठी महापालिकेची स्वतंत्र यंत्रणा असूनसुद्धा कामात हलगर्जीपणा केल्यामुळे विजेचा अपव्यय होताना दिसतो. सध्या पावसाळय़ाचे दिवस असल्याने वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे. मात्र, रस्त्यावरील पथदीप दिवसाढवळय़ा सुरू ठेवल्यामुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत असून हा प्रकार आदर्शनगर वडगाव येथे घडला आहे.
शहरात दररोज कोणत्या ना कोणत्या भागातील पथदीप दिवसा तर काही पथदीप संध्याकाळच्या वेळेस सुरू असतात. काही पथदिपांना दिवे नसल्याने अनेक भागात अंधार पसरलेला असतो. बंद पडलेले पथदिपातील दिवे दुरुस्त करण्याकडे दुर्लक्ष करण्यात येते. दुसरीकडे चालू पथदीप दिवसाही सुरूच असल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. सध्या पावसाळय़ाचे दिवस असल्याने विद्युतपुरवठा खंडित करण्यात येत आहे. तसेच हमखास रात्रीच्या वेळी विद्युतपुरवठा खंडित करण्यात येत असल्याने अनेक नागरिकांना ऐन पावसाळय़ात अंधारात बसावे लागत आहे. एकीकडे विजेची बचत करा असा सल्ला देण्यात येतो, तर दुसरीकडे दिवसाही रस्त्यावरील पथदीप सुरू असल्याने परस्पर विरोधाभास निर्माण झालेला पाहायला मिळत आहे. यामुळे नागरिकांमधून सखेद आश्चर्यही व्यक्त करण्यात येत असून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
मनपाच्या पथदीप विभागाची डोळेझाक
रात्रीच्या वेळी नागरिकांना येणे-जाणे सोयीचे व्हावे यासाठी गल्लोगल्ली पथदीप बसविण्यात आले आहेत. परंतु मनपाच्या पथदीप विभागाची डोळेझाक सुरू असल्याने शहरात दिवसाही पथदीप सुरू असल्याचे दृष्टीस पडत आहे. यामुळे दररोज कोणत्या ना कोणत्या भागात दिवसाही पथदीप सुरू राहिल्याने विजेचा अपव्यय होत आहे. त्यामुळे यावर कायमचा तोडगा काढण्याची मागणी रहिवाशांमधून केली जात आहे.
बुधवारी दिवसभर गोंधळी गल्ली येथील पथदीप सुरूच होते. विजेची बचत करण्यासाठी या परिसरात डेकोरेटिव्ह एलईडी बल्ब लावण्यात आले आहेत. लाखो रुपये खर्च करून लावण्यात आलेले पथदीप पुन्हा दिवसभर सुरू ठेवण्यात येत असल्याने याचा उपयोग काय, असा प्रश्न स्थानिकांकडून उपस्थित केला जात आहे. काही ठिकाणी पथदीप असूनही त्यातील दिवे खराब झाल्याने बरेच दिवस बंद आहेत. काही ठिकाणी पथदीप लोंबकळताना दृष्टीस पडत आहेत. पथदीप विभागाच्या अधिकाऱयांनी दुर्लक्ष केल्यामुळेच असे प्रकार घडत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.