तीन तासांकरिता चार चाकी वाहनांना मोजावे लागतात 50 ते 80 रुपये
प्रतिनिधी /बेळगाव
शहरात पार्किंगची समस्या मोठय़ा प्रमाणात भेडसावत असून, मिळेल त्या ठिकाणी वाहने पार्क करण्याचा प्रकार सुरू आहे. शहरात काही खासगी पार्किंगतळ असून, महानगरपालिकेने एकाच ठिकाणी पार्किंगची सुविधा उपलब्ध केली आहे. चार चाकी वाहने पार्क करण्यासाठी 3 तासांकरिता 50 ते 80 रुपये आकारण्यात येत असल्यामुळे पार्किंग तळाचे महत्त्व वाढले आहे.
बाजारपेठेत येणाऱया नागरिकांची संख्या वाढली आहे. दुचाकी आणि चार चाकी वाहनांचा आकडादेखील वाढत चालला आहे. बाजारात खरेदी करण्यासाठी येणारे नागरिक चार चाकी वाहने घेऊन येण्यास पसंद करीत आहेत. काही नागरिक दुचाकी वाहनांचा वापर करीत असतात. त्यामुळे पार्किंगची समस्या भेडसावत आहे. व्यवसाय-नोकरीनिमित्त येणाऱया कामगारवर्गाची वाहनेदेखील मोठय़ा प्रमाणात आहेत. त्यामुळे पार्किंग कुठे करायचे, हा प्रश्न भेडसावत आहे. पार्किंगच्या मुद्दय़ावर महापालिका सभागृहात अनेकवेळा चर्चा झाल्या. अनेक ठरावदेखील झाले. बापट गल्ली येथे बहुमजली पार्किंग तळ उभारण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता. मात्र, याबाबत तोडगा निघाला नाही. शहरात पार्किंगची समस्या जैसे थे आहे.
पार्किंगतळ निर्माण करावे, अशी मागणी महापालिकेकडे सातत्याने केली जाते. पण बापट गल्लीव्यतिरिक्त शहरात पार्किंग तळ निर्माण करण्यात आले नाही. केवळ चार चाकी वाहनांसाठी मनपाचे एकमेव पार्किंगतळ आहे. काही ठिकाणी चार चाकी वाहनांसाठी खासगी वाहनतळ सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. वाहनतळाची वानवा आणि वाढत्या वाहनांची संख्या पाहता पार्किंग तळाचे महत्त्व वाढले आहे. मनपाच्या वाहनतळात चार चाकी वाहन पार्क करण्यासाठी प्रति तीन तासांकरिता 50 ते 80 रुपये मोजावे लागत आहेत. खासगी वाहनतळांपेक्षा हा दर जास्त असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
बाजारपेठेत परराज्यांतून येणाऱया वाहनधारकांची संख्या मोठय़ा प्रमाणात आहे. त्यामुळे त्यांना वाहनतळाची गरज भासते. आपले वाहन सुरक्षित राहावे या उद्देशाने पार्किंग शुल्क भरून वाहने पार्क केल्याशिवाय पर्याय नाही. एकमेव पार्किंग तळ असल्याने वाहनधारकांना देखील आकारण्यात येणारा शुल्क भरावाच लागतो. पार्किंग शुल्काची आकारणी पाहता वाहनतळाचे महत्त्व वाढत आहे. नो पार्किंगच्या ठिकाणी वाहने पार्क करून 1600 ते 2 हजार रुपये दंड भरण्याऐवजी पार्किंग शुल्कची रक्कम दिलेली बरी, असे समजून वाहनधारक पार्किंगची रक्कम देत आहेत. शहरात पार्किंगची समस्या वाढत चालल्याने या समस्येवर तोडगा काढावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
पार्किंग शुल्क आकारणीचा प्रस्ताव कागदावर
रहदारी सुरळीत होण्यासाठी रस्त्यांचे रुंदीकरण करण्यात आले आहे. मात्र, रुंदीकरण करण्यात आलेला रस्ता आता पार्किंग तळ बनला आहे. याकरिता रामलिंगखिंड गल्लीच्या रस्त्यावर पार्क करण्यात येणाऱया चार चाकी वाहनधारकांकडून पार्किंग शुल्क आकारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, पार्किंग शुल्क आकारण्याचा प्रस्ताव 2018 पासून कागदावर राहिला असल्याने शुल्क आकारण्याचा प्रस्ताव बारगळला आहे.
शहरात पार्किंगची समस्या भेडसावत आहे. यामुळे वाहनधारक पार्किंगकरिता रामलिंगखिंड गल्लीकडे धाव घेत आहेत. यामुळे रामलिंगखिंड गल्ली रस्त्याचे रुंदीकरण पार्किंगकरिता करण्यात आहे का? असा मुद्दा नागरिक उपस्थित करीत आहेत. संपूर्ण रस्त्यावर अस्ताव्यस्तपणे दुचाकी आणि चार चाकी वाहने पार्क केली जात आहेत. येथील रहिवाशांना घरांमधून बाहेर पडण्यासाठी जागा सोडली जात नाही. काही रहिवाशांना स्वतःची वाहने पार्क करण्यासाठी जागा मिळत नाही. यामुळे रामलिंगखिंड गल्लीत पार्क करण्यात येणाऱया वाहनांना शिस्त लावण्याची मागणी करण्यात आल्याने ऑड-इव्हन तारखेवर वाहने पार्क करण्याचा प्रयत्न रहदारी पोलीस प्रशासनाने केला. पण म्हणावा तितका प्रतिसाद मिळाला नाही.
सोयीऐवजी गैरसोयी अधिक बनल्याने याबाबत वाहनधारक आणि रहिवाशांना अधिक डोकेदुखी बनली होती. यामुळे ऑड-इव्हन पद्धत बंद करून तत्कालीन महापालिका आयुक्त शशीधर कुरेर आणि पोलीस उपायुक्त अमरनाथ रेड्डी यांनी रामलिंगखिंड गल्लीची पाहणी केली होती. याबाबत चर्चा करून निर्माण होणाऱया समस्या जाणून घेतल्या. बाजारपेठेत येणारे वाहनधारक रामलिंगखिंड गल्लीमध्ये वाहने पार्क करीत असल्याचे निदर्शनास आले. विशेषतः चार चाकी वाहनांची गर्दी वाढत असल्याचे पाहणीवेळी दिसून आले होते. वाहने पार्क करण्यासाठी कोणत्या पद्धतीचा अवलंब करणे योग्य आहे, याची माहिती घेतली होती.
रामलिंगखिंड गल्लीतील वाहनधारकांना शिस्त लावण्यासाठी पार्किंग शुल्क आकारणे आवश्यक असल्याचा प्रस्ताव पुढे आल्यानंतर चार चाकी वाहनधारकांकडून पार्किंग शुल्क आकारण्याचा प्रस्ताव पुढे आला होता. दि. 1 ऑक्टोबर 2018 पासून पार्किंग शुल्क आकारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, फेब्रुवारी 2022 उजाडले तरी रामलिंगखिंड गल्लीमध्ये पार्क करण्यात येणाऱया वाहनधारकांकडून कोणतेच शुल्क आकारले जात नाही. यामुळे रामलिंगखिंड गल्लीमधे पे-पार्किंग करण्याचा प्रस्ताव बारगळला का? अशी विचारणा होत आहे. महापालिकेकडून विविध निर्णय घेतले जातात. पण याची अंमलबजावणी केली जात नाही. यामुळे पार्किंग शुल्क आकारणी करून शिस्त लावण्याचा प्रस्ताव कागदावर राहिला आहे.