प्रतिनिधी/ कराड
स्वच्छ सर्वेक्षण अभियानात देशात पहिल्या पाचमध्ये येण्याचा संकल्प मलकापूर नगरपरिषदेने केला आहे. स्वच्छता अभियान राबवण्यासाठी शहरात स्वच्छतेचा नारा गल्लोगल्ली दिला जात आहे. मात्र काही सुशिक्षित नागरिकांच्या अशिक्षितपणामुळे मलकापूरच्या प्रवेशद्वारावर अस्वच्छतेचा पहारा वाढताना दिसत आहे. मलकापूर आणि चचेगावच्या बरोबर सीमेवरच नव्याने कचरा डेपो तयार होऊ लागला आहे. कराड नगरपरिषदेने स्वच्छता अभियानात देशात पहिला क्रमांक मिळवला. सलग दोन वेळा कराड नगरपरिषदेने हा विक्रम करून दाखवला. मलकापूर नगरपरिषदेनेही स्वच्छता अभियानात उठावदार कामगिरी करण्यासाठी कंबर कसली. आता पुन्हा एकदा मलकापूर नगरपरिषदेने स्वच्छता अभियानात नंबर मिळवण्यासाठी दंड थोपटले आहेत. त्यासाठी सर्व नगरसेवक, प्रशासन, सुज्ञ नागरिक प्रयत्नशील आहेत. नगरपरिषदेने शहरातील रस्ते स्वच्छतेसाठी 14 स्वच्छतादूत महिलांची नियुक्ती केली आहे. नगरपरिषदेच्या सहा घंटागाडय़ा असून तीन ट्रक्टर कचरा वर्गीकरण करून गोळा करत असतात. नगरपरिषद कचरा संकलनाचा प्रयत्न करत असली, तरी अनेकदा यामधे सातत्य रहात नाही, ही वस्तुस्थिती आहे. यातच नगरपरिषदेच्या घंटागाडय़ांची वेळ ठरलेली आहे. कधी ती मागेपुढे होत असते. मात्र काही सुशिक्षित नागरिक कचरा भरलेली पोतीच्या पोती आणून मलकापूरच्या सीमेवर टाकत आहेत. कराड-ढेबेवाडी रोडवर मलकापूरची हद्द सुरू झाल्यावरच मोठा कचरा डेपो दिसू लागला आहे. या डेपोची उंची दिवसेंदिवस वाढत चालली असून रात्री साडेदहानंतर लोक इथे कचरा आणून टाकतात. त्यामुळे नगरपरिषदेच्या स्वच्छता उपक्रमाला खो बसत आहे. कचरा डेपो वाढल्याने शहरात स्वच्छतेचा नारा आणि प्रवेशद्वारावर अस्वच्छतेचा कायम पहारा असे चित्र निर्माण होत आहे. या कचरामध्ये प्लास्टिक कचरा मोठय़ा प्रमाणात असून तो पर्यावरणाला हानिकारक आहे. शिवाय आगाशिवनगर, मलकापूर भागातील शेकडो लोक पहाटे या भागात फिरायला जात असतात. त्यांना या दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागतो.