शहरासह ग्रामीण भागातील प्रवाशांची चांगलीच गैरसोय
@ प्रतिनिधी/ बेळगाव
बेंगळूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळय़ाची विटंबना करण्यात आल्याने सीमाभागात संतापाची लाट उसळली आहे. या संतापातूनच शुक्रवारी रात्री ग्रामीण भागातील काही बसगाडय़ांवर दगडफेक झाली. त्यामुळे शनिवारी शहरासह ग्रामीण भागातील बससेवा ठप्प झाली. त्यामुळे प्रवाशांची चांगलीच गैरसोय झाली.
शनिवारी सकाळी काही ग्रामीण बस धावल्या. मात्र शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने विविध गावच्या बससेवा बंद करण्यात आल्या. येळ्ळूर, कुदेमनी, उचगाव, बेळवट्टी, कल्लेहोळ, आंबेवाडी, बाकनूर, केदनूर, मण्णिकेरी, कट्टणभावी, राजगोळी, हंदिगनूर, नंदिहळ्ळी, गोल्याळी, मंडोळी, सावगाव, किणये, कर्ले, संतिबस्तवाड, कावळेवाडी, राकसकोप आदी गावांची बससेवा ठप्प झाली होती.
छत्रपती शिवरायांचा अवमान केल्याप्रकरणी सीमाभागातील विविध गावांमध्ये पडसाद उमटू लागले आहेत. अनेक ठिकाणी दगडफेकदेखील झाली. त्यामुळे काही ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला. त्यामुळे काही गावांत केवळ सकाळची एकच फेरी झाली. त्यानंतर दिवसभर बससेवा बंद होती. शहरातील धर्मवीर संभाजी चौक, शिवाजी उद्यान, चन्नम्मा चौक, रामदेव गल्ली व इतर ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने पोलिसांशी चर्चा करून परिवहन बससेवा बंद केली.
शुक्रवारी सायंकाळी ग्रामीण भागात वस्तीची बससेवा धावली. यावेळी काही बसवर दगडफेक झाली. त्यामुळे शनिवारी सकाळपासून शहरासह ग्रामीण भागाची बससेवा बंद करण्यात आली. त्यामुळे परिवहनला आर्थिकदृष्टय़ा फटका बसला आहे.
या प्रकारामुळे कर्नाटक-महाराष्ट्र या आंतरराज्य बससेवेवरदेखील परिणाम झाला आहे. दोन्ही राज्याच्या बस केवळ आपापल्या सीमाहद्दीपर्यंत धावल्या. याबरोबर महाराष्ट्रातदेखील संतापाची लाट उसळल्याने बसवर दगडफेक होऊन फोडाफोडी होईल, या भीतीने दोन्ही राज्यांची बससेवा बंद ठेवण्यात आली आहे. दरम्यान काही खासगी वाहनधारकांनीही वाहतूक बंद ठेवल्याने प्रवाशांची गैरसोय झाली.
20 गावांच्या बससेवा बंद
-पी. वाय. नाईक (विभागीय नियंत्रण अधिकारी)
ग्रामीण भागातील 20 गावांच्या बससेवा बंद ठेवल्या होत्या. मात्र लांबपल्ल्याच्या बस सुरळीत सुरू आहेत. तणावाचे वातावरण सुरळीत झाल्यानंतर ग्रामीण भागातील बससेवा पूर्ववत सुरू होईल. महाराष्ट्र राज्याला लागून असलेल्या गावांची बससेवा बंद केली आहे.