बेळगाव : / प्रतिनिधी
लॉकडाऊनचा दुसरा टप्पा संपला असून तिसऱया टप्प्याला सुरूवात झाली आहे. सोमवारी लॉकडाऊन काही अंशी शिथिल करण्यात आल्याने शहरातील रस्त्यांवर नागरिकांची वर्दळ वाढलेली पहायला मिळाली. सोमवारी शहराचा पारा 38 अंशांवर पोहोचला होतो. त्यामुळे तब्बल दीड महिन्यानंतर बाजारात आलेल्या नागरिकांच्या शरिरीराची लाही-लाही झाली. लॉकडाऊनमुळे थंड पदार्थांची विक्री करणारी सर्व दुकाने बंद असल्याने नागरिकांची गैरसोय झाली.
एप्रिल महिन्यात वळीव पावसाने हजेरी लावली होती. मात्र सध्या ढगाळ वातावरण असले तरी पाऊस नसल्याने उष्णतेत कमालीची वाढ झाली आहे. त्यामुळे लॉकडाऊनमुळे घरी बसलेले नागरिक मात्र वाढत्या उष्मामुळे हैराण झाले आहेत. चार दिवसांपासून ढगाळ वातारण असले तरी पावसाने मात्र हुलकावणी दिली आहे. त्यामुळे कुलर, एसी, फॅनचा वापर वाढलेला पहायला मिळत आहे.
लॉकडाऊनमुळे जनता घरी बसून मेटाकुटीला आली आहेत त्यातच वाढत्या उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले आहेत. भर उन्हाळय़ातच कोरोनाने देशात थैमान घातल्याने जनतेला वाढत्या उष्म्याबरोबर कोरोनाशी सामना करावा लागत आहे. उन्हापासून थंडावा देणारे रसवंतीगृहे, थंडपेयाची दुकाने लॉकडाऊनमुळे बंद असल्याने थंडपेयाविना नागरिकांना घरी परतावे लागत आहे. लॉकडाऊनमुळे शहरात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. शहरातील चौका-चौकात तैनात केलेल्या पोलीसांनाबरोबच शहरात अत्यावश्यक सेवा पुरविणारे नागरिक उष्म्याने हैराण झाले आहेत.
उन्हाळय़ात शरीराचे तापमान नियंत्रित करण्यासाठी अननस, मोसंबी, कलिंगड, कोकम सरबत, लिंबू पाणी, ऊसाचा रस, आइस्कीम, ज्युस यासारख्या शीतपेयांकडे वाढलेला दिसून येतो. मात्र कोरोनामुळे सर्व काही बंद असल्याने बाजारपेठेत आलेल्या नागरिकांची थंडपेयाविना गैरसोय होत आहे.