अनेक मैदानांमध्ये गैरप्रकार, पोलीस प्रशासन सुस्त
प्रतिनिधी / बेळगाव
बेळगाव शहराची व्याख्या ही स्वच्छ शहर आणि सुंदर शहर अशी आहे. मात्र या शहराच्या सुंदरतेला अनेकांकडून गालबोट लावण्याचे काम सुरू असल्याचे दिसून येत आहे. बेळगाव शहरातील खुल्या जागा आणि मैदानेही आता सुरक्षित राहिली नाहीत. त्या ठिकाणी तळीराम आणि जुगार खेळणाऱयांमुळे दहशत माजत असल्याचे दिसून येत आहे. अनेक मैदानांवर गैरप्रकार होत असून याकडे पोलीस प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे.
बेळगाव शहरातील खुल्या जागा, मैदाने व उद्यानांचा गैरवापर वाढला आहे. मूळ उद्देश बाजूला राहून इतर खासगी कारणांसाठी या जागा वापरल्या जात असून ते कायद्याने चुकीचे आहे. दरम्यान असे करण्यास परवानगी देणे हा कायद्याचा भंग होत असून त्याची दखल घ्यावी. काही ठिकाणी तर मैदानांवरच कब्जा करण्यात आल्याचे प्रकार उघडकीस येत आहेत. बेळगाव शहर व परिसरातील असे प्रकार रोखण्यासाठी पोलिसांनी रात्रीची गस्त घालण्याची गरज निर्माण झाली आहे.
महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात असो किंवा शहरातील मैदाने, उद्याने व खुल्या जागा मूळ उद्देश वगळून त्या ठिकाणी गैरप्रकार करण्यातच धन्यता मानण्यात येत आहे. बेळगाव शहरात अनेक ठिकाणी मैदाने नसल्यामुळे समस्या होत आहे. बेळगाव शहर व उपनगरांत असणाऱया मैदानांमध्ये रात्रीच्यावेळी तळीराम दारू ढोसून त्या ठिकाणी मद्याच्या बाटल्या फेकून देतात. मैदानाच्या सभोवती हे चित्र पहावयास मिळते. त्यामुळे मनपाच्या कर्मचाऱयांनी स्वछता तरी किती करायची? ही बाब नित्याची बनली आहे. तेंव्हा याकडे आता गांभीर्याने लक्ष देऊन मैदाने वाचविण्यासाठी व अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.