अधूनमधून दमदार सरी, सखल भागात पाणीच पाणी
प्रतिनिधी/ बेळगाव
मंगळवारी सकाळपासूनच पावसाने सुरुवात केली. त्यानंतर दुपारी दमदार पावसाने शहरासह ग्रामीण भागाला चांगलेच झोडपले. या पावसामुळे शहरातील सखल भागांमध्ये पाणीच पाणी झाले. तर शहरातील जनजीवन काही प्रमाणात विस्कळीत झाले होते. काही ठिकाणी गटारी भरुन पाणी रस्त्यावरुन वाहताना दिसत होते. या पावसामुळे हवेमध्ये चांगलाच गारवा निर्माण झाला होता.
पावसाचा जोर वाढल्याने नदी, नाले काही प्रमाणात प्रवाहित झाले आहेत. चार ते पाच दिवसांपासून शहर आणि परिसरात अधूनमधून पाऊस सुरुच आहेत. मंगळवारी सकाळपासूनच पावसाच्या सरी कोसळल्या. सततच्या पावसामुळे शहराच्या सखल भागात पाणी साचून राहिले आहे. तसेच अनेक भागात चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. तापमानात घट झाल्याने अनेकांना रेनकोटबरोबरच स्वेटरचाही आधार घ्यावा लागला.
रस्त्यांवरील खड्डय़ात पाणी साचल्याने गैरसोय
शेतकरी वर्ग सुखावला असून शेतामधील कामांनाही वेग आला आहे. अजूनही काही प्रमाणात पेरणीची कामे बाकी असून ती खोळंबली आहेत. सध्या काही ठिकाणचे नदी, नाले प्रवाहित झाले आहेत. विहिरींच्या पाणी पातळीतही वाढ होत आहे. आठ दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शहरातील रस्त्यांची दुर्दशा झाल्याचे दिसून येत आहे. काही भागातील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. अनेक रस्त्यांवरील खड्डय़ात पाणी साचल्याने नागरिकांना व वाहन चालकांना यातून वाट काढताना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. पावसाळ्यापूर्वीच रस्त्यांवर असलेले खड्डे बुजविणे गरजेचे होते. मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे सध्या रस्त्यांवरुन प्रवास करताना शहरवासियांना चांगलाच ताप सहन करावा लागत आहे.
बाजारपेठेतील गर्दीही ओसरली
संततधार पावसाने अनेक विक्रेत्यांची तारांबळ उडत आहे. तसेच बाजारपेठेतील गर्दीही ओसरली आहे. याचबरोबर सततच्या पावसामुळे भाजी विक्रेते, दुचाकीस्वार, फेरीवाले यांना त्रास सहन करावा लागत आहे.
बळीराजाला पाऊस फायदेशीर
जिल्हय़ात सर्वत्र पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतामधील कामांनाही जोर आला आहे. गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा वेग काहीसा मंदावला होता. मात्र मंगळवारी पुन्हा पावसाची दिवसभर रिपरिप सुरू झाली आहे. त्यामुळे शहरातील जनजीवन काहीसे विस्कळीत झाले होते. या पावसामुळे पाणी समस्या काही प्रमाणात दूर झाली आहे. तसेच बळीराजाला हा पाऊस फायदेशीर ठरला आहे. मात्र अजूनही भात लहान असल्यामुळे अधिक पाऊस पडू नये, अशी अपेक्षा शेतकऱयांतून व्यक्त होत आहे.
मंगळवारी दिवसभर पाऊस झाल्याने फेरीवाले, भाजी विपेते आणि इतर व्यावसायिकांची तारांबळ उडाली होती. खरेदीदारांनाही पावसातच भिजत खरेदी करावी लागली. मंगळवार असल्याने काही प्रमाणात बाजारपेठेत गर्दी कमी होती. दुचाकीस्वारांना रेनकोटचा वापर करावा लागला. याचबरोबर पादचाऱयांनाही छत्रीशिवाय बाहेर पडता आले नाही.