प्रतिनिधी / बेळगाव
शहरातील निम्मे पथदीप बंद असून दुरुस्तीकडे मनपा अधिकाऱयांनी कानाडोळा केला आहे. दुसरीकडे अशोक चौक ते राष्ट्रीय महामार्गापर्यंतचे पथदीप दिवसाही सुरू आहेत. पथदीप रात्रीच्या वेळी बंद आणि दिवसा सुरू असल्याने मनपाच्या कारभाराबद्दल नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
राष्ट्रीय महामार्ग ते अशोक चौकपर्यंतचा रस्ता शहराचे प्रवेशद्वार म्हणून ओळखला जातो. येथील अरुंद रस्त्याचे रुंदीकरण करून पथदीप बसविण्यात आले आहेत. स्मार्ट सिटी बनविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याने रस्त्याशेजारी फुटपाथ आणि सायकल ट्रक निर्माण केले आहे. पण अद्यापही सायकल ट्रकचा वापर होत नाही. येथील फुटपाथचा वापर फेरीवाले करीत आहेत. पथदिपांची देखभाल व्यवस्थित केली जात नसल्याने पथदीप केव्हा सुरू होतील आणि केव्हा बंद राहतील याचा नेम नाही. नागरिकांना रात्रीच्या वेळी अंधारामधून ये-जा करावी लागत असल्याने पथदीप सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. पण शहरातील निम्मे पथदीप बंद असल्याने अंधार पसरलेला आहे. एकीकडे पथदीप नादुरुस्त असल्याने बंद आहेत. दुसरीकडे दिवसाही पथदीप सुरू आहेत.
अशोक चौक ते राष्ट्रीय महामार्गापर्यंतच्या रस्त्यावरील बहुतांश दिवे दिवसभर सुरू आणि रात्रीच्या वेळी बंद असतात. त्यामुळे ये-जा करणाऱया नागरिकांना आणि वाहनधारकांना अंधारामधून जावे लागते. हा वर्दळीचा भाग असून विविध उपनगरे व रुग्णालये असल्याने नागरिक ये-जा करीत असतात. पण नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागतो. वास्तविक पाहता शहरातील पथदिपांची दुरुस्ती करून नागरिकांना सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. मात्र, महापालिकेच्या अधिकाऱयांचे दुर्लक्ष झाले आहे.
महापालिकेच्या कारभाराबद्दल संताप
दिवसा दिवे सुरू राहत असल्याने वीज वाया जात आहे. महापालिकेला विद्युत बिलापोटी मोठय़ा प्रमाणात रक्कम मोजावी लागत आहे. त्यामुळे महापालिकेच्या कारभाराबद्दल संताप व्यक्त करण्यात येत आहे. परिसरातील पथदिपांची पाहणी करून दुरुस्तीचे काम हाती घ्यावे तसेच रात्रीच्या वेळी दिवे सुरळीत सुरू ठेवावेत, अशी मागणी होत आहे.