घरच्या हालाखीच्या परिस्थितीमुळे तडजोड करणे पडले भाग : मुलांनी शिक्षण घ्यावे यासाठीच त्यांची पहाटे 5 पासून धडपड
मनीषा सुभेदार / बेळगाव
त्यांचा दिवस सुरू होतो पहाटे 5 वाजता. साखर झोप म्हणजे काय? हे त्यांना माहीत नाही. एक कप चहा घेऊन त्या कला मंदिरकडे येतात. आणि कंत्राटदार जो प्रभाग देतो तेथे जाऊन कचरा संकलन सुरू करतात. परिस्थितीचे टक्केटोणपे खात त्यांचा संघर्ष सुरू आहे तो केवळ मुलांसाठी. असा संघर्ष करत परिस्थितीवर मात करणाऱया आहेत यल्लव्वा गोल्लर.
आज सर्वच क्षेत्रात महिलांचा सहभाग पाहतो. उच्चपदापासून तळापर्यंत महिलांचे हात राबत असलेले पहायला मिळतात. कचरा संकलन असो किंवा कचरा वेचणे असो, हे काम करणाऱया महिलांची संख्या अधिक आहे. यल्लव्वासारख्या अनेकजणी शहरात हे काम करताना पहायला मिळतात.
भावंडांसाठी सोडले शिक्षण
यल्लव्वा या बेळगावच्याच, खासबाग येथे त्यांचे माहेर. बालपणी दोन भावंडांबरोबर त्या शाळेत गेल्या. मात्र दोन भावांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी पालकांनी त्यांची शाळा बंद केली. घरच्या हालाखीच्या परिस्थितीमुळे ही तडजोड स्वीकारणे भाग पडले. माझी भावंडे शिकून शहाणी व्हावीत म्हणून मी घरी राहणे मान्य केले, असे त्या सांगतात.
यल्लव्वांचे 18 वर्षांनंतर लग्न झाले. मात्र आपल्या लग्नाची तारीख किंवा जन्म तारीख त्यांना माहीत नाही. लग्न झाले खरे परंतु जोडीदाराची साथ म्हणावी तशी लाभली नाही. दहा वर्षांपूर्वी तीन मुलांची जबाबदारी यल्लव्वावर सोपवून पतीने जगाचा निरोप घेतला आणि त्यांची एकाकी लढत सुरू झाली. त्यांचे स्वताचे घरही नाही. कुटुंब चालविण्यासाठी, मुलांच्या शिक्षणासाठी त्या घराबाहेर पडल्या. सात वर्षांपासून कंत्राटी पद्धतीवर त्या कचरा संकलन करण्याचे काम करतात.
कचऱयाचे विभाजन आवश्यक
पहाटे 5.30 वाजता त्यांना पहिल्या रेल्वेगेटजवळ कला मंदिरपाशी येऊन थांबावे लागते. कंत्राटदार जो प्रभाग देतो त्या प्रभागात जाऊन कचरा संकलन करावा लागतो. वास्तविक नियमानुसार सुका व ओला कचरा असे विभाजन करणे आवश्यक आहे. परंतु नागरिक सर्व कचरा एकत्रच देतात. त्यामुळे आमचाही नाईलाज होतो, असे त्या सांगतात.
महानगरपालिकेतर्फे कचरा संकलकांना हातमोजे, बूट तर अलीकडे कोरोनामुळे मास्क हे साहित्य दिले जाते. परंतु लोक काच, पत्रा, धातूसुद्धा कचऱयात एकत्रच टाकतात. त्यामुळे हातमोजे फाटतात. शिवाय अनेकदा हाता-पायांना जखमा होतात. याकडे यल्लव्वा लक्ष वेधतात. अपार्टमेंटमध्ये जाऊन कचरा संकलन करत नसल्याने अनेकांचा रोष त्यांना पत्करावा लागतो. मात्र अधिकाऱयांनी अपार्टमेंटच्या बाहेरच कचरा संकलन करण्याची सूचना केली आहे. शिवाय काही अपार्टमेंटमध्ये कचरा संकलन करणाऱयांवरच चोरीचा आरोप झाला आहे. त्यामुळे आम्हाला गेटाच्या आत प्रवेश करता येत नाही, असे यल्लव्वा यांनी सांगितले.
दररोज कसरत
पहाटे 5.30 पासून दुपारी 2.30 पर्यंत यल्लव्वा यांचे काम सुरू असते. प्रत्येक प्रभागात गाडी फिरत असते. मात्र खाली उतरून कचरा संकलन करणे, पुन्हा तो गाडीत टाकणे शिवाय प्लास्टिक, पत्रा जमेल तसा वेगळा काढणे, अशी कसरत नेहमीच करावी लागते. कधी कधी अंगदुखीचा त्रासही सहन करावा लागतो. मात्र मुलांच्या शिक्षणासाठी राबणे अपरिहार्य आहे, असे त्या नमूद करतात.
यल्लव्वा यांना तीन मुले असून मुलगी कॉलेजच्या पहिल्या वर्षात आहे. आई कामाला गेल्याने मुलगी स्वयंपाक व घरकाम उरकून कॉलेजला जाते. दुर्दैव म्हणजे लहान मुलगा गर्भात असतानाच त्यांच्या पतीचे निधन झाले. माझ्या मुलांनी शिक्षण घेऊन उत्तम नोकरी करावी, अशी अपेक्षा त्या व्यक्त करतात.
समाजाने दृष्टिकोन बदलावा
कचरा संकलक असो किंवा कचरा वेचक असो, समाजाचा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. अशा लोकांना सहसा कोणी घरी घेत नाही. परंतु यल्लव्वा सहजपणे हे वास्तव मान्य करतात. लोक कचरा निर्माण करतात आणि आम्ही तो उचलतो. त्यामुळे समाजाने माणूस म्हणून आमच्याकडे सन्मानाने पहायला हवे, असे त्यांना वाटते. मात्र याबाबत त्या फारशा आग्रही नाहीत. महानगरपालिकेचे हे काम अद्याप त्या कंत्राटी पद्धतीने करतात. अजूनही आम्हाला कायम केले नाही. आमचे कंत्राटदार उत्तम गणाचारी यांचे सहकार्य लाभते. शिवाय गाडीवर असणारे चालक व सहकारी हे सुद्धा सहकार्य करतात. याचाही यल्लव्वा उल्लेख करतात.
कचरा वेचक व संकलक करणाऱया महिला व पुरुष हे समाजावर एका अर्थाने उपकारक ठरतात. त्यांना कामाचा पगार मिळतो हे मान्य असले तरी कचऱयात हात घालणे, त्याची उचल करणे हे काही सोपे काम नाही. त्यासाठी वेगळी मानसिकता असावी लागते. कचरा पाहून नाके मुरडणारे आपण सर्व या महिलांच्या कामाचे महत्त्व जाणू शकलो तरी या सर्व सफाई कर्मचाऱयांच्या कामाचे सार्थक होईल, हे नक्की!
तक्रार कशाला करायची हा प्रश्न
कचऱयाचे विघटन करणे आवश्यक आहे. परंतु लोक ऐकत नाहीत. दुर्दैवाने लहान मुलांचे पॅड, सॅनिटरी पॅड्स हे सुद्धा कचऱयात एकत्रच टाकतात. त्यामुळे हाताला बऱयाचदा घाण लागते, दुर्गंधी येते. परंतु एकदा आपल्या कामाचे हेच स्वरूप आहे, हे मान्य केल्यावर तक्रार कशाला करायची हा त्यांचा प्रश्न आहे.